शनिवार, १७ डिसेंबर, २०१६

स्‍वावलंबनातून बंधा-याचे काम

फेसबुक.कॉम/मराठी बोधकथा

कथा क्र.255

उत्तर प्रदेशातील एका छोट्याशा गावात एका संन्‍याशाने मुक्काम केला होता. ज्‍या गावात संन्‍याशीबुवा राहत होते तेथे पावसाळ्यात गंगानदीला प्रचंड पूर येत असे. त्‍यामुळे गाव पाण्‍यात बुडून जात असे. संन्‍याशीबाबांना हे गावाचे दु:ख बघवले नाही. त्‍यांनी गावक-यांना याबाबत विचारले असता सगळे गावकरी म्‍हणाले महाराज पाऊसकाळ सुरु झाला की आम्‍ही आमची घरेदारे इथेच सोडून दुस-याठिकाणी स्‍थलांतर करतो. पाऊस येतो, गंगामाई रौद्रावतार धारण करते आणि आमचे सर्वस्‍व लुटून परत जाते. मग पूर ओसरला की आम्‍ही येथे येतो आणि पुन्‍हा सगळी जमवाजमव चालू होते. संन्‍याशीबुवांना वाईट वाटले, त्‍यांनी संपूर्ण गावाची पाहणी केली आणि त्‍यांच्‍या असे लक्षात आले की एकाच ठिकाणाहून गावात नदी प्रवेश करते आणि त्‍या जागेवर जर बंधारा बांधला तर नदीचा गावातील प्रवेशाचा मार्ग बदलता येऊ शकतो. यासाठी त्‍यांनी गावातील लोकांना बंधारा बांधण्‍याविषयी सुचविले. गावकरी म्‍हणाले, महाराज, आम्‍ही प्रशासनास नदीवर बंधारा बांधण्‍याविषयी अनेकदा सांगून पाहिले पण त्‍याची दखल कोणीही घेतली नाही. संन्‍याशीबुवा म्‍हणाले, मग आपण बंधारा बांधूया. श्रमदानाने काही वाटेल ते शक्य आहे. पण कोणीही तयार झाले नाही. मग दुसरे दिवशी संन्‍याशीबुवाने स्‍वत:च कुदळ, फावडे, पाटी घेऊन बंधा-याचे काम सुरु केले. काही लोकांनी ते पाहिले. रोजच संन्‍याशी दिवसभर एकटाच काम करत असे. पण इतका मोठा बंधारा बांधणे हे काही त्‍यांच्‍या एकट्याच्‍या आवाक्याबाहेरचे होते. लोकांनी हे संन्‍याशीबुवाचे काम पाहिले व त्‍यांना वाटू लागले की हे महाराज त्‍यांचा कोणताही स्‍वार्थ नसताना किंवा त्‍यांचे कोणतेच नुकसान होत नसताना केवळ आपल्‍यासाठी इतके कष्‍ट घेत आहेत मग आपणही त्‍यांची मदत केली पाहिजे. हळूहळू लोकांनी महाराजांना मदत करायला सुरुवात केली आणि मग सगळ्या गावक-यांनी मिळून मोठा बंधारा त्‍या नदीवर बांधून काढला व पूर येण्‍यापासून गावाचे संरक्षण केले.

तात्‍पर्य :- अशक्‍य वाटणा-या गोष्‍टीसुद्धा एकमेकांच्‍या सहकार्याने सहजगत्‍या साध्‍य होऊ शकतात. गरज आहे ती फक्त संघटीत होऊन काम करण्‍याची.

वर्तमानपत्रातून संग्रहित

मराठी बोधकथा

अहंकारी राजाला धडा

फेसबुक.कॉम/मराठी बोधकथा

कथा क्र.254

एक अहंकारी राजा होता. त्‍याला आपल्‍या ऐश्‍वर्याचा आणि राज्‍याचा गर्व होता. तसेच आपली शक्‍ती आणि रूपावरही तो अहंगंड बाळगून असायचा. आपल्‍या बुद्धीचा टेंभा मिरवायचा. युद्धात जय मिळाला की त्‍याला गर्व चढायचा. आपल्‍यासमोर तो इतरांना तुच्‍छ लेखत असे. कोणाचा मुलाहिजा न बाळगता त्‍याचा तो अपमान करत असे. दुस-याला कमी लेखण्‍याचा त्‍याचा प्रयत्‍न असायचा. या कारणांमुळे लोक त्‍याच्‍यावर नाराज असायचे. त्‍याच राज्‍यात एका विद्वान पंडीताने त्‍याला वठणीवर आणण्‍याचे ठरविले. एके दिवशी तो पंडीत राजाच्‍या दरबारात गेला आणि राजाला प्रणाम केला. राजाने उद्दामपणे प्रतिनमस्‍कारही केला नाही उलट त्‍याने पंडीताला गर्वाने विचारले,’’बोला पंडीत महाराज, तुम्‍हाला काय मदत पाहिजे. काय मागायचे असेल ते मागून घ्‍या, दान पाहिजे असेल तर दान घ्‍या किंवा धन पाहिजे, सोनेनाणे, जमीन, धान्‍य जे काही मागायचे ते तुम्‍ही माझ्याकडून मागून घ्‍या’’ पंडीतजीने राजाकडे एकवार पाहिले व तो मोठमोठ्याने हसू लागला. राजाला व दरबारातील लोकांना पंडीताच्‍या हसण्‍याचे कारण काही कळेना, हसण्‍याचा भर ओसरल्‍यावर पंडीत म्‍हणाला,’’राजन, तुम्‍ही मला काय दान देणार कारण तुमच्‍याकडे मला देण्‍यासारखे काहीच नाही.’’ पंडीताचे हे बोलणे ऐकताच राजा संतापून लालबुंद झाला, राजाचे सैनिक पंडीताला मारायला धावून आले पण सेनापतीने सैनिकांना आवरले व पंडीताला पुढे काही बोलण्‍याची इच्‍छा आहे काय असे विचारले. त्‍यावर पंडीतजी म्‍हणाले,’’ महाराज, जरा थंड डोक्‍याने विचार करा, तुमचा जन्‍मच मुळी तुमच्‍या इच्‍छेने झाला नाही, मग रूप, सौंदर्य आणि पराक्रम हे गुण तुम्‍हाला कोठून मिळाले असते. आईवडीलांनी तुम्‍हाला जन्‍म दिला म्‍हणून तुम्‍ही जन्‍माला आलात. तुमचे धान्‍यभांडार हे धरतीमातेचे देणे आहे. तिने पिकवून तिच्‍या लेकरांसाठी अन्‍न पुरविले म्‍हणून तुम्‍ही ते सांभाळत आहात आणि खजिन्‍याचे म्‍हणाल तर धन हे करातून आलेले म्‍हणजेच प्रजेचे देणे आहे, राज्‍य हे तुम्‍हाला वाडवडीलांकडून मिळालेले वरदान आहे राहता राहिले शरीरातील प्राण पण तेही तुमचे नाहीत ते सुद्धा ईश्‍वराची कृपा आहे हे सगळेच जर तुम्‍हाला दुस-याने दिलेले असेल तर तुम्‍ही मला काय म्‍हणून देणार आणि दिलेल्‍या गोष्‍टीचा काय म्‍हणून गर्व बाळगणार.’’ एवढे बोलून पंडीताने राजदरबार सोडला व राजाने त्‍यादिवसापासून गर्व पण सोडून दिला,

तात्‍पर्यः- जे आपले नाही त्‍यावर गर्व बाळगणे व्‍यर्थपणाचे आहे.

वर्तमानपत्रातून संग्रहित

मराठी बोधकथा

विश्‍वासाला तडा



कथा क्र.253


एका लोककथेनुसार राम नावाच्‍या एका माणसाकडे एक उमदा आणि सुंदर घोडा होता. तो त्‍या घोड्याची काळजी घ्‍यायचा. त्‍यामुळे त्‍या दोघांचेही एकमेकावर प्रेम जडलेले होते. शाम नावाच्‍या एका घोड्याच्‍या व्‍यापा-याने तो घोडा पाहिला आणि त्‍याला तो घोडा फारच आवडला. शामने तो घोडा मिळविण्‍याचे कारस्‍थान रचले. शामने रामच्‍या रोजच्‍या येण्‍याजाण्‍याच्‍या रस्‍त्‍यावर भिका-याचे सोंग घेतले व आजारी असल्‍याचे नाटक करत बसला. दुसरीकडून राम घोड्यावर बसून येत होता तेव्‍हा शाम जोरजोराने विव्‍हळू लागला, गयावया करू लागला. रामने ते पाहिले व तो शामपाशी थांबला. शाम रामला म्‍हणाला,’’मी आजारी आहे मला तुझ्या घोड्यावरून पुढच्‍या गावापर्यंत नेशील का,’’ रामला त्‍याची दया आली, त्‍याने त्‍याला घोड्यावर बसविले, आणि स्‍वतः पायी चालू लागला. थोडे पुढे जाताच शाम त्‍याचा घोडा घेऊन पुढे गेला व त्‍याने पुढील गावी जाऊन तो घोडा विकून टाकला. दुस-या दिवशी शाम रामकडे आला व म्‍हणाला,’’ अरे मी तुझा घोडा जर विकत मागितला असता तर तू मला तो दिला नसतास म्‍हणून मला आजारी भिका-याचे सोंग घ्‍यावे लागले.’’ यावर राम शांतपणे शामला म्‍हणाला,’’ मित्रा, मी तुला मदत केली होती ही गोष्‍ट तू इथून पुढे कोणालाही सांगू नकोस कारण तुझी ही गोष्‍ट ऐकल्‍यावर जगात कोणीच गरीबांना, गरजूंना मदत करणार नाही. विश्‍वासघात करणे महापाप आहे’’

तात्‍पर्यः- गरजूला मदत करण्‍यापूर्वी तो खरेच गरजवंत आहे याची खात्री करणे सूज्ञपणाचे ठरते.

वर्तमानपत्रातून संग्रहित

मराठी बोधकथा

राजा आणि संत

फेसबुक.कॉम/मराठी बोधकथा

कथा क्र.252

एका वनात दोन संत राहत होते. एकांतात आपल्‍या तपश्‍चर्येत लीन राहत होते. कधीतरी यात्रेकरूंचा जत्‍था जायचा तेव्‍हा ते संत त्‍यांच्‍याशी बोलत असत. त्‍याच यात्रेकरूकडून त्‍यांना तेथील राजास त्‍या संतांबाबत माहिती मिळाली. तो या दोघांना भेटण्‍यास निघाला. जेव्‍हा संतांना ही गोष्‍ट कळाली.तेव्‍हा त्‍या दोघांना वाटले की आता राजा येणार व त्‍याने आपला चांगूलपणा पाहिला तर तो आपणास सतत भेटण्‍यास येईल, त्‍याच्‍याबरोबर अनेक माणसे येतील, त्‍यां माणसांच्‍या संगतीने अजून काही माणसे येतील व अशाने या वनातील शांती भंग पावेल व एकांत मिळणार नाही व एकांत नसल्‍याने आपणास ध्‍यानसाधना करता येणार नाही. राजा आम्‍हाला दोघांना सामान्‍य माणूस समजेल असे काहीतरी केले पाहिजे. राजाचा लवाजमा तेथे पोहोचला तेव्‍हा राजाने पाहिले की ते दोघेही संत हातात लाठ्याकाठ्या घेऊन एकमेकांशी भांडत होते. पहिल्‍या संताने दुस-याला म्‍हटले,'' तू स्‍वत:ला कोण समजतोस, मी इतके ज्ञान मिळविले आहे की ते तू सात जन्‍मातही मिळवू शकणार नाही.'' दुसरा संत त्‍यावर म्‍हणाला,'' अरे तू तर पक्का खोटारडा आहेस, तुझ्या ज्ञानाच्‍या गप्पा मारून तू लहान मुलाला फसवू शकशील पण मला नाहीस. तुझ्यापेक्षा जास्‍त ज्ञान मी माझ्या शिष्‍यांना दिले आहे.'' राजाने व त्‍याच्‍याबरोबरच्‍या लोकांनी हे भांडण पाहिले व विचार करू लागले हे साधू संत तर सामान्‍य माणसाप्रमाणेच भांडत आहेत व त्‍यांनी सर्वांनी असल्‍या साधूसंतांचा संग नको म्‍हणून वनातून जाणेच पसंत केले. राजा व लोक जाताच दोन्‍ही संतांनी एकमेकांकडे पाहून मंदस्मित केले व गळाभेट घेतली. दोन्‍हीही साधू आपल्‍या साधनेत रममाण झाले.

तात्‍पर्य : चांगली गोष्‍ट घडवून आणण्‍यासाठी कधीकधी चुकीच्‍या मार्गाचाही अवलंब करावा लागतो.

वर्तमानपत्रातून संग्रहित

मराठी बोधकथा

लालसेपायी जीव गेला

फेसबुक.कॉम/मराठी बोधकथा

कथा क्र.251

जय आणि विजय यांच्‍यात घनिष्‍ट मैत्री होती. दोघेही पट्टीचे पोहणारे होते. नदीच्‍या पाण्‍यात भरपूर मस्‍ती केली. तितक्‍यात स्‍थानिक प्रशासनाकडून बंधा-याकडून पाणी सोडण्‍यात येत असल्‍याची सूचना देण्‍यात आली. त्‍यामुळे दोघेही नदीच्‍या बाहेर आले. जेव्‍हा बंधा-यातील पाणी सोडण्‍यात आले तेव्‍हा नदीला पूर आल्‍यासारखी स्थिती निर्माण झाली. जय आणि विजय सुरक्षित स्‍थळी थांबले होते. नदीच्‍या पाण्‍याचा ओघ पाहत असतानाच नदीच्‍या प्रवाहात एक घोंगडी तरंगत येत असल्‍याचे दोघांच्‍याही दृष्‍टीस पडतील. विजयला ती घोंगडी ओढून आणावीशी वाटली. जयने त्‍याला थांबविण्‍याचा प्रयत्‍न केला. परंतु विजयने तोपर्यंत पाण्‍यात उडी मारली होती. तो घोंगडीजवळ गेला आणि तिला ओढत असतानाच त्‍याचे संतुलन बिघडले. विजय जितका जोम लावून किना-यावर येण्‍याचा प्रयत्‍न करत असतानाच पाण्‍यात उठणा-या लाटा त्‍याला दूर लोटत असत. मित्र असा संकटात सापडलेला पाहून जय ओरडला,''अरे मित्रा, घोंगडी सोड आणि परत निघून ये'' पण विजय म्‍हणाला,'' अरे जय मी घोंगडी सोडण्‍याचा खूप प्रयत्‍न करतो आहे पण घोंगडीनेच मला धरून ठेवले आहे.'' जयला कळून चुकले की विजयला त्‍या घोंगडीची लालसा निर्माण झाली आहे. विजयने घोंगडीसह किना-यावर येण्‍याचा खूप प्रयत्‍न केला पण तो अयशस्‍वी ठरला. शेवटी तो पाण्‍यात मृत्‍युमुखी म्‍हणतात.

तात्‍पर्य- कोणत्‍याही प्रकारची लालसा प्रसंगी आपल्‍या जीवाशी खेळू शकते.

वर्तमानपत्रातून संग्रहित

मराठी बोधकथा

दानाचे महत्‍व

फेसबुक.कॉम/मराठी बोधकथा

कथा क्र.250


हजरत उमर आपल्‍या रयतेची खूप काळजी घेत असत. ते स्‍वत:ची व आपल्‍या परिवाराची चिंता नकरता जनतेचे दु:ख निवारणार्थ झोकून देत. एका प्रसंगाची गोष्‍ट आहे, काही कारणाने राजधानीत आग लागली, आग इतक्‍या वेगाने पसरली की तिने शहराचा अर्धा भाग व्‍यापून टाकला. लोकांनी खूप पाणी टाकले पण आग आटोक्‍यात येण्‍याची काही चिन्‍हे दिसेनात. हजारो लोकांची घरे, दारे, पिके सगळे जळून खाक झाले. मनुष्‍यहानीही मोठया प्रमाणावर झाली. लोकांचा आक्रोश वाढत होता. आगीचा वणवा पसरतच चालला. आगीचे लोळ भडकत चालले. शेकडो घरे आगीच्‍या भक्ष्‍यस्‍थानी पडत होती. जनतेला एकाच भयाने ग्रासले होते. आग आटोक्‍यात कशी आणायची कशी, आग विझत नसल्‍याने लोकांनी हजरत उमरला उपाय विचारले, तेसुद्धा आग विझविण्‍यात तनमनधनाने व्‍यग्र होते. उमरनी लोकांना सांगितले, ''ही आग म्‍हणजे खुदाचा कोप असावा, तुम्‍ही लोकांनी आता आग विझविण्‍यासाठी पाणी टाकण्‍याचे काम सोडा, गरिबांना अन्नदान करा. कदाचित खुदा यामुळे प्रसन्न होईल आणि आगीपासून आपली सुटका करेल.'' जनतेतील लोक म्‍हणाले,''हजरत साहेब आपण धर्मादाय संस्‍‍थेचे सर्व दरवाजे सगळ्यांसाठी आधीच उघडे ठेवलेले आहेत. कोणीही गरीब आमच्‍याकडे आला तर आम्‍ही त्‍याला दान करतोच. मग आमच्‍यावर तो नाराज कसा'' हजरत उमरने समजावले,''तुम्‍ही जे दान करता त्‍यामागे निष्‍काम भावना नाही. तुम्‍हाला वाटते दानाचे पुण्‍य म्‍हणून तुम्‍हाला सन्‍मान किंवा प्रशंसा हवी असते. या देखाव्‍याला पुण्‍यकर्म म्‍हणत नाहीत.'' हजरत उमरच्‍या खुलाशानंतर जनतेने आपली चूक सुधारली अन आश्‍चर्य म्‍हणजे आग पूर्णपणे विझून गेली. जनतेने खुदाचे व हजरत साहेबांचे आभार मानले.

तात्‍पर्य :- नि:स्‍वार्थ भावनेने केलेले दान कधीही लोकांच्‍या अंतरात्‍म्‍यापर्यंत पोहोचते.

वर्तमानपत्रातून संग्रहित

मराठी बोधकथा

संस्‍कारीत मुलेच यशस्‍वी

फेसबुक.कॉम/मराठी बोधकथा

कथा क्र.249


नैतिक मूल्‍यांचे शिक्षण देणा-या एका शिक्षकाने मुलांसाठी चॉकलेटस मागवली होती. त्‍यांनी सगळ्या मुलांना रांगेत बसवले होते. शिक्षक चॉकलेटस वाटायला सुरुवात करणार इतक्यात शाळेचा शिपाई त्‍या वर्गात येऊन पोहोचला व म्‍हणाला,''सर तुम्‍हाला आताच्‍या आत्‍ता प्राचार्यांनी काही महत्‍वाचे सांगण्‍यासाठी त्‍यांच्‍या कार्यालयात बोलावले आहे.'' शिक्षकांनी चॉकलेटचा डबा हातातून खाली ठेवला व मुलांना म्‍हणाले,'' मुलांनो मला काही कामासाठी प्राचार्यांकडे जावे लागत आहे. खरेतर ही चॉकलेटस मला माझ्या स्‍वत:च्‍या हाताने तुम्‍हाला द्यायची खूप इच्‍छा होती. परंतु मला जावे लागणार आहे. पाहिजे तर तुम्‍ही हाताने चॉकलेटस घेऊ शकता. अन्यथा मी परत आल्‍यावर तुम्‍हाला देईन'' ही चांगली संधी आहे. असा काही विद्यार्थ्‍यांनी विचार केला व त्‍यांनी चॉकलेटस स्‍वत:च्‍या हाताने घेऊन खाल्ली तर काही विद्यार्थ्‍यांनी शिक्षकांची वाट बघण्‍यात वेळ घालविला. शिक्षक परत आले व त्‍यांनी मुलांना विचारले,'' मुलांनो ज्‍यांनी ज्‍यांनी स्‍वत:च्‍या हाताने चॉकलेटस खाल्ली त्‍यांनी आपले हात वर करा'' ज्‍यांनी चॉकलेटस खाल्ली होती त्‍यांनी हात वर केले. मग शिक्षकांनी उरलेल्‍या मुलांना प्रेमाने चॉकलेटस वाटली. काही वर्षानंतर त्‍या शिक्षकांनी त्‍या विद्यार्थ्‍यांची माहिती मिळविली तेव्‍हा त्‍यांना असे दिसून आले की ज्‍या मुलांनी स्‍वत:च्‍या हाताने चॉकलेटस घेतले होते ती मुले सामान्‍य स्‍वरूपातील कामे करून उदरनिर्वाह करत होते तर ज्‍यांना शिक्षकांनी चॉकलेटस दिली ते सर्व विद्यार्थी उच्‍च पदावर काम करत होते. ही सर्व संस्‍कारांची देणगी होती.

तात्‍पर्य :- संस्‍काराने माणूस घडतो. मिळालेली संधी आणि तिचा योग्य वापर करणे हे मानवाच्‍या हाती आहे. चुकीच्‍या मार्गाने गेल्‍यास व संयम न पाळल्‍यास योग्‍य संधी मिळूनही तिचा वापर करता येत नाही.

(या कथेचे अजूनही काही तात्‍पर्य निघू शकतील पण इथेच थांबूया)

वर्तमानपत्रातून संग्रहित

मराठी बोधकथा

गुरु केले कासवाला

फेसबुक.कॉम/मराठी बोधकथा

कथा क्र.248


कोणे एके काळी एका नगरात एक वृद्ध एकटाच राहत होता. छोट्याशा झोपडीत राहून तो आजूबाजूच्‍या शेतात छोटीमोठी कामे करून स्‍वत:ची गुजराण करत असे. आपल्‍या गरजा त्‍याने खूपच मर्यादित ठेवल्‍या असल्‍याने त्‍याला फारसा खर्च येत नसे. मात्र हे असताना त्‍याने एक कासव पाळले होते आणि त्‍या कासवावर त्‍याचा फार जीव होता. दुपारी आपले जेवण तयार करताना तो कासवासाठी हरभरे भिजवून त्‍याला देत असे. रिकामा वेळ असताना तो त्‍या कासवाशी संवाद साधत असे. आजूबाजूचे लोक त्‍याचे ते कासवप्रेम पाहून हसत असत. एके दिवशी एक परिचित मनुष्‍य त्‍याला भेटण्‍यासाठी आला. थोडा वेळ इकडचे तिकडचे बोलून झाल्‍यावर त्‍याने त्‍या कासवाला पाहिले व तो मनुष्‍य म्‍हणाला,'' तू इतका घाणेरडा प्राणी कशासाठी पाळला आहेस. सोडून दे त्‍या कासवाला.'' त्‍याच्‍या बोलण्‍याने वृद्धाला खूप वाईट वाटले. वृद्ध म्‍हणाला,''अरे मित्रा, तू असे बोलून माझ्या काळजाला हात घातला आहेस. इतके वाईट तर मी कधीच त्‍या कासवाबद्दल माझ्या मनात किंवा स्‍वप्‍नातसुद्धा विचारत आणत नाही. ते कासव माझ्या गुरुस्‍थानी आहे म्‍हणून माझ्या मनात त्‍याच्‍याबद्दल खूप आदर आहे.'' तो माणूस म्‍हणाला,''ते कासव तुझे गुरु कसे काय बरे ठरते'' वृद्ध म्‍हणाला,'' कासव हे मानवी मनाचे प्रतिक आहे. कासव आपल्‍याला हे शिकवते की त्‍याच्‍यावर जरा जरी संकटाची चाहूल लागली तरी ते जसे स्‍वत:चे अंग आक्रसून कवचाखाली जाते त्‍याप्रमाणेच मानवाने वाईट गोष्‍टींची जराशी चाहूल जरी लागली तरी त्‍यापासून लांब राहिले पाहिजे. कासवाप्रमाणे आपण आपल्‍या मनाला वाईट गोष्‍टींपासून अंग चोरण्‍याचा प्रयत्‍न केला तर मानवाचे त्‍यात भले आहे.''

वर्तमानपत्रातून संग्रहित

मराठी बोधकथा