मंगळवार, ११ फेब्रुवारी, २०१४

शेती आणि देव


कथा क्र.175

एकदा एक शेतकरी देवावर खूप नाराज झाला. नाराजीचे कारणही तसेच होते कारण कधी पाऊस जास्‍त पडत असे तर कधी पूर्ण दुष्‍काळ, कधी ऊन जास्‍त तर कधी ढगाळ वातावरण, कधी गारा पडून पीकाचे नुकसान होई तर कधी वा-याने उभे पीक आडवे होत असे. एक दिवस वैतागून त्‍याने देवाला साद घातली व देवास सांगितले,''तुम्‍ही सर्वव्‍यापी प्रभू परमेश्‍वर असाल इतर सर्व गोष्‍टीतले तुम्‍हाला कळत असेल पण माझ्यामते तरी तुम्‍हाला शेतीतले काहीच कळत नाही. एक प्रार्थना तुम्‍हाला मी करतो तुम्‍ही फक्त एक वर्षभर निसर्ग माझ्या ताब्‍यात द्या मग बघा शेती कशी फुलते ते. घरोघरी मी धान्‍यांच्‍या राशी घालतो ते पहाच तुम्‍ही.'' देव हसला आणि म्‍हणाला,''तथास्‍तू, तुझ्या म्‍हणण्‍याप्रमाणे आज, आतापासून मी निसर्गाचा लहरीपणा बंद करून तो तुझ्या ताब्‍यात मी देत आहे. तू तुला जसा पाहिजे तसा ऋतु बनवून घे व शेती कर'' इतके बोलून देव निघून गेला. शेतक-याने या वरदानाचा फायदा घेण्‍यासाठी गहू पेरले, जेव्‍हा त्‍याला जेवढे ऊन पाहिजे होते तेव्‍हा त्‍याने ऊन पाडले, जेव्‍हा त्‍याला पाणी द्यायचे होते तेव्‍हा त्‍याने पावसाचा वर्षाव केला. प्रचंड ऊन, गारा, पूर, सोसाट्याचा वारा याचा स्‍पर्शही कधी त्‍याने आपल्‍या पीकांना होऊ दिला नाही. काळ निघून गेला आणि त्‍याची शेती बहरून आली. शेतक-याला मोठा आनंद झाला. कधी नव्‍हे इतके पीक आले होते. शेतक-याने मनातल्‍या मनात विचार केला की आता देवाला कळेल की शेती कशी केली जाते, उगाचच तो शेतक-यांना कसा त्रास होईल ते वरून पाहत असतो. पीक कापणीस आले आणि शेतकरी मोठ्या आनंदाने, गर्वात पीक कापणीसाठी शेतात गेला. पीकाला हात लावून पाहिला आणि तो बेशुद्ध होऊनच खाली पडला. कारण गव्‍हाच्‍या त्‍या लोंब्यांमध्‍ये एकही दाणा नव्‍हताच मुळी. पीक नुसते आलेले दिसत होते पण एकही गव्‍हाचा दाणा त्‍यात नव्‍हता. थोड्यावेळाने तो शुद्धीवर आला आणि धाय मोकलून रडू लागला. त्‍याचे काळीज पिळवटणारे रूदन ऐकून परमात्‍मा परमेश्वर तेथे प्रकट झाला आणि म्‍हणाला,'' अरे वेड्या तुला काय वाटले, तू तुझ्या इच्‍छेप्रमाणे जसा पाहिजे तसा वागला म्‍हणून पीक तसे येत नसते. त्‍या पिकाला तू कधीच संघर्ष करू दिला नाही. सोसाट्याच्‍या वा-यातच पिक उभे राहते तेव्‍हाच त्‍याच्‍यात बळ येते. प्रचंड उन्‍हातही त्‍याच्‍यात जगण्‍याची इच्‍छा बळावते. संकटाशी जोपर्यंत सामना करत नाही तोपर्यंत त्‍याला त्‍याची कुवत कळत नाही. सगळे जर मनाप्रमाणे घडले तर कोणत्‍याच गोष्‍टीची किंमत राहत नाही. आव्‍हान मिळाले नाही म्‍हणून तुझ्या पीकात दाणे भरलेच नाहीत. वारा सुटतो, गारा पडतात तेव्‍हाच त्‍या पिकात जगण्‍याची उमेद निर्माण होते आणि ते संघर्ष करून नवीन जीवन निर्माण करण्‍याचा प्रयत्‍न करते. तू हे कधीच होऊ दिले नाही म्‍हणून तुझे पीक हे पोकळ निघाले. सोन्याला सुद्धा चकाकी येण्‍यासाठी आधी आगीतून जावे लागते तेव्‍हाच ते चकाकते. हातोडीचे मार सोसावे लागतात तेव्‍हाच सोन्‍याचा उत्‍कृष्‍ट दागिना बनतो.'' आता शेतक-याला जीवनाचे सार उमगले होते.

कथासार- जीवनात जर संघर्षच नसेल तर, आव्‍हाने नसतील तर मनुष्‍य अगदी खिळखिळा बनून राहतो. त्‍याच्‍यात कोणतेच गुण येऊ शकत नाहीत. संकटेच माणसाला तलवार किंवा ढाल बनण्‍याची प्रेरणा देतात. कधी तलवार बनून वार करायचा आणि कधी ढाल बनून सामोरे जायचे हे संकटाकडूनच माणूस शिकतो. जीवनात जर कधी यशस्‍वी व्‍हायचे असेल तर संकटांपासून कधीच पळून चालणार नाही. संघर्ष केल्‍यानेच संकटे दूर होतात त्‍याच्‍यापासून दूर पळून नाहीत.

शुक्रवार, ७ फेब्रुवारी, २०१४

अदृश्‍य पेरू

था क्र 174

एका सात वर्षाच्‍या मुलीला एक शिक्षक गणित शिकवित होते. त्‍यांनी तिला प्रश्‍न विचारला,'' समजा मी तुला एक पेरू दिला, मग एक पेरू दिला आणि मग पुन्‍हा एक पेरू दिला तर तुझ्यापाशी किती पेरू होतील?'' मुलीने काही काळ विचार केला आणि बोटे मोजत उत्तर दिले,'' चार पेरू'' शिक्षक आश्‍चर्यचकित झाले, त्‍यांना वाटले की मुलीने नीट ऐकले नसावे म्‍हणून त्‍यांनी प्रश्‍न पुन्‍हा विचारला,'' बाळा प्रश्‍न नीट ऐक,'' समजा मी तुला एक पेरू दिला, मग एक पेरू दिला आणि मग पुन्‍हा एक पेरू दिला तर तुझ्यापाशी किती पेरू होतील?'' मुलगी शिक्षकांच्‍या आश्‍चर्यचकित चेह-याकडे पाहत विचार करू लागली मगाशी मी चार उत्तर दिले तर शिक्षक आश्‍चर्यात पडले आता असे काय उत्तर द्यावे जेणेकरून ते खुश होतील. तिच्‍या डोक्‍यात असा विचार जरा सुद्धा स्‍पर्शून गेला नाही की खरे उत्तर द्यावे तिला फक्त असे वाटत होते आपल्‍या उत्तराने शिक्षक खुश झाले पाहिजेत. ती पुन्‍हा बोटे मोजू लागली व तिने उत्तर दिले, '' सर चार पेरू माझ्याकडे असतील.'' आता शिक्षक निराश झाले व विचार करू लागले की या मुलीला बहुधा पेरू आवडत नसावेत म्‍हणून ती चुकीचे उत्तर देत आहे म्‍हणून त्‍यांनी प्रश्‍न बदलून विचारायचे ठरवले,'' बाळा समजा मी तुला एक चिकू दिला, मग एक चिकू दिला आणि मग पुन्‍हा एक चिकू दिला तर तुझ्यापाशी किती चिकू होतील?'' मुलीने परत बोटे मोजली व उत्तर दिले,'' सर तीन चिकू असतील माझ्याकडे'' शिक्षकांना याची मोठी गंमत वाटली कि तीन वेळेला चुकीचे उत्तर देणारी मुलगी चौथ्‍या वेळेला कशी काय बरोबर उत्तर देते, त्‍यांना वाटले की आता या मुलीला गणिताची गंमत कळाली, म्‍हणून त्‍यांनी परत आपला पहिलाच प्रश्‍न रिपीट केला,''समजा मी तुला एक पेरू दिला, मग एक पेरू दिला आणि मग पुन्‍हा एक पेरू दिला तर तुझ्यापाशी किती पेरू होतील?'' मागच्‍या वेळचे उत्तर बरोबर आल्‍याने मुलीचा आत्‍मविश्‍वास आता वाढला होता तिने फारसा वेळ न दवडता उत्तर दिले,'' सर माझ्याकडे चार पेरू असतील'' हे चुकीचे उत्तर ऐकून शिक्षक संतापले व तिच्‍या दिशेने जात जोरात ओरडले,'' तुला काही डोक्‍याचा भाग वगैरे आहे की नाही, जरा मला पण सांग की चार पेरू कसे काय होतील तुझ्याकडे'' सरांना असे रागावलेले पाहून ती छोटीसी मुलगी रडू लागली, डोळ्यातून अश्रुंच्‍या धारा वाहत असतानाच ती मुलगी दप्‍तर शोधू लागली, दप्‍तरात हात घालून तीने दप्‍तरातील एक पेरू काढून शिक्षकांना म्‍हणाली,'' सर तुम्‍ही मला तीन पेरू देणार आहात आणि माझ्याकडचा एक पेरू मी त्‍यात मिसळत गेले त्‍यामुळे सर मी चार पेरू हे उत्तर देत होते.''

तात्‍पर्य मित्रांनो, आपले ही असेच होते ना ब-याचदा, समोरच्‍याकडून जर अनुकुल प्रतिसाद आला नाही तर आपण आपला संयम गमावून बसतो पण त्‍याची बाजू काय आहे हे आपण कधीच समजून घेत नाही. त्‍याचा त्‍यापाठीमागील तर्क, त्‍यावेळची परिस्थिती, तो ज्‍या संस्‍कृतीमध्‍ये वाढला आहे त्‍याचे संस्‍कार याचा आपण कधीच विचार करत नाही ना. तेव्‍हा जर इथून पुढे कधी जर आपल्‍या मनासारखा प्रतिसाद समोरच्‍याकडून आला नाही तर त्‍याचीही कृपया बाजू समजून घ्‍या. काय सांगावे त्‍याच्‍याजवळ असणारा तो छुपा पेरू आपल्‍याला दिसतही नसेल कदाचित.