बुधवार, २३ ऑक्टोबर, २०१३

गेलेला ऋतूच बरा

कथा क्र.138

हिवाळ्याचे दिवस होते. एक गाढव थंडीने कुडकुडत होते व खायला शिळे गवत मिळत होतं तेव्हा त्याला वाटले, उन्हाळ्याचेच दिवस बरे होते. आपल्याला उन्हाळा आवडत नव्हता पण या हिवाळ्यापेक्षा तेच दिवस बरे होते. हवाही उबदार होती व गवतही ताजे मिळत होते. गाढवाच्या मनात असे विचार आले, त्याच दिवशी त्याच्या मालकाने त्याला गोठ्यात बांधले व ताजे गवत खायला घातले. असे बरेच दिवस त्याला जागेवरच ताजे गवत मिळू लागले, त्या बदल्यात मालक त्याच्याकडूनच बरेच काम करून घेई. आता हिवाळ्याचाही त्याला कंटाळा आला व तो पावसाळा येण्याची वाट पाहू लागला. लवकरच पावसाळा तोंडावर आला. मृगाचा पहिला पाऊस पडला आणि त्याचा मालक चार महिने शेतीची कष्टाची कामे गाढवाकडून करून घेऊ लागला. तेव्हा त्या गाढवाला वाटले, हिवाळाच बरा होता, म्हणजे येणाऱ्या ऋतुपेक्षा गेलेलाच ऋतू बरा असे त्याला वाटू लागले. 

तात्पर्य : कुठलेही कसेही दिवस आले तरी अतृप्त मनाच्या माणसांचे कधीही समाधान होत नाही.
.................................................................................
वर्तमानपत्रातून संग्रहित 
........................................................................

(पद्माने फेडले कर्ज)

कथा क्र.137

पद्माचा जन्‍म सामान्य राजपूत घरात झाला होता, जेव्‍हा ती अडीच वर्षाची होती तेव्‍हा तिच्‍या आईवडीलांचा मृत्‍यू झाला होता. मात्र पद्माचा भाऊ जोरावरसिंह सोळा वर्षाचा होता. वडीलांना कमाविलेल्‍या धनातून पद्माचे पालनपोषण करत असे. त्‍याने पद्माला घोड्यावर बसणे, तलवार चालविणे, बाण चालविणे याचे प्रशिक्षण दिले होते. पद्मा नेहमीच सैनिकांचे कपडे घालत असे. जोरावरसिंह याच्‍याजवळील वडीलांनी मिळविलेले धन संपले तेव्‍हा त्‍याने काम शोधण्‍याचा प्रयत्‍न केला पण त्‍याला काम मिळाले नाही. खर्च चालविण्‍यासाठी त्‍याने सावकाराकडून पैसे उसने घेतले व वायदा केला की काम मिळताच पैसे परत करीन पण त्‍याला काम मिळत नाही हे पाहून सावकाराने जोरावरसिंहाला कैद केले. अशा परिस्थितीत पद्मा एकटी पडली. पण तिने न डगमगता धाडसाने राजपूत सैनिकीरूपात आपले युद्धकौशल्‍य ग्‍वाल्‍हेरच्‍या तत्‍कालिन महाराजांसमोर प्रदर्शित केले. प्रभावित होऊन राजांनी तिला सैनिकाची नोकरी दिली. पद्माने युद्धात इतकी वीरता सिद्ध केली की तिला हवालदार हे पद मिळाले ती आपल्‍या वेतनातून सावकाराचे कर्ज फेडण्‍यासाठी थोडे थोडे पैसे जमा करू लागली. परंतु एके दिवशी सेनापतीने तिचे हे रहस्‍य जाणून घेतले आणि महाराजांना सांगितले. महाराजांनी कारण विचारल्‍यानंतर तिने आपली कथा सांगितली हे ऐकून महाराजांनी जोरावरसिंह याची सावकाराच्‍या कैदेतून सुटका केली व त्‍याला आपल्‍या सैन्‍यात भरती केले व पद्माचा विवाह सैन्‍यातील एका वरिष्‍ठ अधिका-याशी करून दिला.

तात्‍पर्य-विपरीत परिस्थितीतसुद्धा आपल्‍याला पूर्ण ताकदीने संघर्ष करता आला पाहिजे.
.......................................................................
वर्तमानपत्रातून संग्रहित