बुधवार, १ जानेवारी, २०१४

शेळी, करडू आणि लांडगा

कथा क्र.162


एक शेळी सकाळी उठून चरण्यासाठी रानात जाण्यास निघाली. त्यावेळी ती आपल्या करडास म्हणाली, "बाळ, आपल्या खोपटाचे दार आतून लावून घे.' सगळ्या लांडग्याचा सत्यानाश होवो' असे शब्द जो उच्चारील त्यासच आत घे, इतरांस दार उघडू नको.' हे भाषण एका लांडग्याने आडून ऐकले आणि शेळी बाहेर जाताच, खोपट्याच्या दारापाशी येऊन तो म्हणाला, "सगळ्या लांडग्यांचा सत्यानाश होवो' शेळीने सांगितलेले शब्द उच्चारताच करडू दार उघडील असे त्यास वाटले होते, पण त्या करडास त्याचा शब्द ऐकून संशय आल्यामुळे, त्याने दार उघडले नाही. ते लांडग्यास म्हणाले, "तू जर बोकड आहेस, तर तुला दाढी कशी नाही?' हा प्रश्न ऐकून लांडगा ओशाळला आणि निमूटपणे चालता झाला. 


तात्पर्य : फसवेगिरी करणाऱ्या माणसासंबंधात शक्य तितकी सावधगिरी ठेवावी.
______________वर्तमानपत्रातून संग्रहित
_______________

यशोविजय पंडित

कथा क्र.161

आजपासून तीन शतकांपूर्वी यशोविजय नावाचा एक विख्‍यात प्रकांड पंडित होऊन गेला. तो अनेक विषयांत निपुण होता. त्‍याच्‍या बाबतीत असे सांगण्‍यात येते की एकदा त्‍याला पंडीतांमार्फत एक विषय देण्‍यात आला होता. त्‍या विषयानुसार तो संस्‍कृतमध्‍ये बोलत राहिला. मात्र हळूहळू त्‍याला आपल्‍या पांडित्‍याचा गर्व होऊ लागला. व्‍याख्‍यानाच्‍यावेळी त्‍याच्‍या सांगण्‍यावरून त्‍याचे शिष्‍य चारही बाजूंनी झेंडे लावत असत. याचा अर्थ असा की, चारही दिशांमध्‍ये त्‍याचे नाव झाले आहे. विद्वत्ता आणि सफलता याचे प्रदर्शन अन्‍य शिष्‍यांना योग्‍य वाटत नव्‍हते. पण त्‍याला विचारण्‍याचे कोणीच धाडस करत नव्‍हते. एकेदिवशी एका शिष्‍याने त्‍याला मोठ्या हुशारीने विचारले, ''गुरुदेव, आपले पांडित्‍य धन्‍य आहे, मी मोठा भाग्‍यवान आहे की आपल्‍यासारख्‍या महापुरुषाचे दर्शन मला झाले, आपल्‍या सत्‍संगाचा लाभ झाला. एक प्रश्‍न मला बरेच दिवसापासून पडतो आहे पण धाडस करून हे विचारतो की, आपण जर इतके विद्वान आहात तर आपले गुरु व गुरुंचे गुरु किती मोठे विद्वान होते?'' पंडीत म्‍हणाले,''मी तर त्‍या दोघांपुढे काहीच नाही. त्‍यांच्‍या चरणाच्‍या धुळीइतकेसुद्धा मला ज्ञान नाही'' शिष्‍य म्‍हणाला,'' ते इतके विद्वान होते तर तेसुद्धा आपल्‍यासारखेच चारी बाजूंना झेंडे लावत असत का?'' पंडीताला आपली चूक समजली व त्‍याचे हृदय अहंकाररहित झाले.


तात्‍पर्य:-ज्ञानाचे महत्‍व तेव्‍हाच असते जेव्‍हा ते ज्ञान अभिमानमुक्त असेल. अहंकाररहित ज्ञानच खरे मार्गदर्शक असते. अहंकाराने बाधित ज्ञान सर्वनाशाला कारणीभूत ठरते. 
______________वर्तमानपत्रातून संग्रहित _______________