बुधवार, १९ मार्च, २०१४

सदाचरण व नैतिकता

कथा क्र. 187

फार वर्षापूर्वी वाराणसी येथे देवमित्र नावाचे राजपुरोहित राहत होते. राजाला राजपुरोहितांच्‍या विद्वत्तेचा व योग्‍यतेचा यथायोग्‍य आदर होता म्‍हणूनच तो त्‍यांची प्रत्‍येक गोष्‍ट ऐकत असे. प्रजेमध्‍येसुद्धा राजपुरोहितांबद्दल सन्‍मानपूर्वक आदर होता. एक दिवस राजपुरोहितांना वाटले की राजा आणि इतर सर्व प्रजा आपल्‍याला इतक्‍या आदरपूर्वक का वागवतात याचे कारण जाणून घ्‍यावे. राजपुरोहितांनी हे जाणून घेण्‍यासाठी एक गुप्‍त योजना बनविली. दुस-या दिवशी त्‍यानी दरबारातून परतताना राजाच्‍या खजिन्‍यातून एक सुवर्णमुद्रा गुपचुप उचलून घेतली. हे खजिनदाराने पाहिले पण ते पाहून त्‍याने न पाहिल्‍यासारखे केले. हा प्रकार परत दुस-या दिवशीही घडला. राजपुरोहितांनी पुन्‍हा दुस-या दिवशी हळूच एक सुवर्णमुद्रा उचलली व स्‍वत:जवळ ठेवली. तिस-या दिवशी त्‍यांनी एक मुठभर सुवर्णमुद्रा उचलल्‍या व खिशात भरल्‍या. यावेळी मात्र खजिनदाराने सैनिकांना बोलावले व राजपुरोहितांना कैद करण्‍यास सांगितले. राजपुरोहितांना कैद झाली ही गोष्‍ट राजाच्‍या कानावर गेली. न्‍यायदान करताना राजाने आपला निर्णय दिला की राजपुरोहितांकडून घडलेल्‍या या चुकीबद्दल त्‍यांना तीन महिने सक्त कारावासाची सजा देण्‍यात यावी. तीनवेळेला त्‍यांनी कोषातून धन चोरले म्‍हणून तीन महिने सजा देण्‍यात आली आहे जेणेकरून ते पुन्‍हा असा अपराध करण्‍यात यशस्‍वी होणार नाही. या न्‍यायावर राजाने राजपुरोहितांची प्रतिक्रिया विचारली. राजपुरोहितांनी राजाला यामागील कारण सांगताना,'' राजन, मी काही अट्टल चोर नाही. मी फक्त जाणून घेण्‍यास इच्‍छुक होतो की लोक कशामुळे मला सन्‍मान देतात, वैयक्तिक माझा सन्‍मान करतात की मी करत असलेल्‍या सदाचरणाचा लोक सन्‍मान करतात. पण आता माझ्या लक्षात आले आले आहे की लोक हे माझ्या विद्वत्तेपेक्षा माझ्या सदाचरणाला महत्‍व देतात. गैरवर्तणूक करताच मी दंडास प्राप्‍त झालो आणि त्‍यावेळेला माझी विद्वत्ता, संपत्ती, मानमरातब हे काहीही मदतीला आले नाही. माझे सद आचरण हेच माझ्या सन्‍मानाचे कारण आहे हे मला समजून चुकले आहे. मी माझ्या गैरवर्तणुकीबद्दल आपली क्षमा मागतो.'' राजाने यावर सांगितले,''राजपुरोहित महाराज, तुम्‍ही कोणत्‍याही भावनेतून जरी हे कार्य केले असले तरी तुम्‍हाला दंड होणे क्रमप्राप्त आहे तरी तुम्‍ही शिक्षेस तयार राहा.'' राजपुरोहितांनी राजाचे म्‍हणणे ऐकले व स्‍वत:ला सैनिकांच्‍या स्‍वाधीन केले.


तात्‍पर्य :-सदाचरण हेच मनुष्‍याचे धन आहे. नैतिकता पाळणे आणि ती आचरणात आणणे यातच मनुष्‍यजन्‍माचे सार्थक आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा