शनिवार, २८ डिसेंबर, २०१३

कष्‍टाची कमाई श्रेष्‍ठ


कथा क्र.160

एका नगरात दोन चोर राहत होते. प्रत्‍येक दिवशी ते चोरी करत आणि दोन हिस्‍से करून वाटत असत. एक हिस्‍सा स्‍वत:साठी व दुसरा हिस्‍सा ईश्‍वराला देत असत. एका रात्री ते चोरीसाठी निघाले. बरीच भटकंती करूनही त्‍यांना चोरी करण्‍याची संधी मिळाली नाही. दोघेही थकून मंदिराच्‍या ओट्यावर बसले. तेथे त्‍यांना एक संत भेटले. संताने त्‍यांना परिचय विचारला तर त्‍यांनी स्‍वत:बाबत खरे सांगितले. हे ऐकून संत म्‍हणाला, तुम्‍ही जे करत आहात ते चांगले की वाईट आहे यावर कधी तुम्‍ही विचार केला आहे? चोर म्‍हणाले,'' आम्‍ही करत आहोत ते चांगलेच असणार कारण चोरी करून आम्‍ही जे धन किंवा वस्‍तू प्राप्‍त करतो ते आम्‍ही दोन भागांमध्‍ये वाटतो. एक भाग आम्‍ही स्‍वत:कडे ठेवतो आणि दुसरा भाग ईश्‍वराला चरणी अर्पण करतो. तेव्‍हा त्‍या संताने आपल्‍या झोळीतून एक जिवंत कोंबडा काढला आणि त्‍यांना देत म्‍हणाला,'' आज तुम्‍ही चोरी करू श्‍कला नाहीत त्‍यामुळे निराश वाटत आहात हा कोंबडा ठेवा. याचे दोन हिस्‍से करा एक स्‍वत:साठी ठेवा आणि दुसरा ईश्‍वरचरणी ठेवा.'' दोघेही चोर आश्‍चर्यचकित झाले संतांच्‍या बोलण्‍याचा आशय समजून म्‍हणाले,''महाराज इथून पुढे आम्‍ही चोरी न करता कष्‍टाची कमाई करून खाऊ आणि त्‍यातील एक हिस्‍सा ईश्‍वरचरणी ठेवू.'' दोघेही संताला नमस्‍कार करून निघून गेले.

तात्‍पर्य :-पापाची कमाई असंतोष आणि दु:खाचे कारण बनते तर कष्‍टाची कमाई मानसिक सुख, शांतता आणि आत्‍म्‍याला सुख देते.


सत्‍कृत्‍य


कथा क्र.159

एका वनात एक पारधी राहत होता. त्‍याने खूप वन्‍य प्राण्‍यांची हत्‍या केली होती. त्‍यामुळे तो खूप पापी झाला होता. त्‍याची चाहूल लागली तरी वन्‍यप्राणी भीतीने प्राणी थरथर कापत असत. एकेदिवशी तो आपल्‍या शिकारीच्‍या शोधात असताना एका बेलपत्राच्‍या झाडावर चढला. खूप वेळ झाला तरी एकही शिकार त्‍याच्‍या हाती लागली नाही. तो खूप चिडला व बेलपत्राच्‍या झाडाचे एक एक पान खाली टाकू लागला. बराच वेळ हा त्‍याचा उद्योग चालू होता. झाडाच्‍या बुंध्‍याशी बेलपत्राचा हा मोठा ढीग तयार झाला पण हे पारध्‍याला माहित नव्‍हते. त्‍या झाडाखाली एक महादेवाची पिंड होती. त्‍या पिंडीवर बेलाच्‍या पानांचा ढीग पाहून महादेव प्रसन्‍न झाले व ते पारध्‍याच्‍या समोर प्रकट झाले. त्‍यांना समोर पाहून पारधी आश्‍चर्यचकित झाला व म्‍हणाला,''महादेवा, मी खूप क्रूर आहे, अनेक वन्‍यप्राणी मारले आहेत, खूप हिंसा केली आहे, पाप खूप केले पण पुण्‍याचे एकही काम केलेले मला तरी आठवत नाही तरी पण आपण मला कसे बरे प्रसन्‍न झालात?" यावर महादेव म्‍हणाले,''तू हिंसक आहेस, तुझ्या नकळत का होईना तू माझी पूजा केली आहेस. पूजा-प्रार्थना हे असे काम आहे की ते चुकून जरी घडले तरी त्‍याचे चांगलेच फळ मिळते. जर चुकून प्रार्थनेचे फळ इतके चांगले मिळत असेल तर नेहमी तर सत्‍कार्य केलेस तर किती फळ मिळेल? पारध्‍याला आपली चूक समजली व त्‍याने आयुष्‍यभर कष्‍ट करून जीवन जगला.

तात्‍पर्य :- एका सत्‍कृत्‍यामुळेदेखील आपले आयुष्‍य बदलून जाऊ शकते.