शनिवार, २८ डिसेंबर, २०१३

सत्‍कृत्‍य


कथा क्र.159

एका वनात एक पारधी राहत होता. त्‍याने खूप वन्‍य प्राण्‍यांची हत्‍या केली होती. त्‍यामुळे तो खूप पापी झाला होता. त्‍याची चाहूल लागली तरी वन्‍यप्राणी भीतीने प्राणी थरथर कापत असत. एकेदिवशी तो आपल्‍या शिकारीच्‍या शोधात असताना एका बेलपत्राच्‍या झाडावर चढला. खूप वेळ झाला तरी एकही शिकार त्‍याच्‍या हाती लागली नाही. तो खूप चिडला व बेलपत्राच्‍या झाडाचे एक एक पान खाली टाकू लागला. बराच वेळ हा त्‍याचा उद्योग चालू होता. झाडाच्‍या बुंध्‍याशी बेलपत्राचा हा मोठा ढीग तयार झाला पण हे पारध्‍याला माहित नव्‍हते. त्‍या झाडाखाली एक महादेवाची पिंड होती. त्‍या पिंडीवर बेलाच्‍या पानांचा ढीग पाहून महादेव प्रसन्‍न झाले व ते पारध्‍याच्‍या समोर प्रकट झाले. त्‍यांना समोर पाहून पारधी आश्‍चर्यचकित झाला व म्‍हणाला,''महादेवा, मी खूप क्रूर आहे, अनेक वन्‍यप्राणी मारले आहेत, खूप हिंसा केली आहे, पाप खूप केले पण पुण्‍याचे एकही काम केलेले मला तरी आठवत नाही तरी पण आपण मला कसे बरे प्रसन्‍न झालात?" यावर महादेव म्‍हणाले,''तू हिंसक आहेस, तुझ्या नकळत का होईना तू माझी पूजा केली आहेस. पूजा-प्रार्थना हे असे काम आहे की ते चुकून जरी घडले तरी त्‍याचे चांगलेच फळ मिळते. जर चुकून प्रार्थनेचे फळ इतके चांगले मिळत असेल तर नेहमी तर सत्‍कार्य केलेस तर किती फळ मिळेल? पारध्‍याला आपली चूक समजली व त्‍याने आयुष्‍यभर कष्‍ट करून जीवन जगला.

तात्‍पर्य :- एका सत्‍कृत्‍यामुळेदेखील आपले आयुष्‍य बदलून जाऊ शकते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा