रविवार, १९ जानेवारी, २०१४

खुनी सेनापती

कथा क्र.166

कुशलगडचा राजा वीरभद्रला एके दिवशी सेनापतीने सूचना दिली,''महाराज, काल रात्री आपल्‍या महालात आपल्‍या सैनिकाची हत्‍या झाली आणि त्‍याच्‍या मृतदेहाजवळ हे पत्र मिळाले आहे'' राजाने ते पत्र वाचले, त्‍यात राजाला धमकी देण्‍यात आली होती की,'लवकरच कुशलगडचे सिंहासन खाली केल नाही तर रोज एक सैनिक मारला जाईल' राजाने खुन्‍याचा शोध घेण्‍याचा आदेश दिला, या दरम्‍यान वीरभद्रचा मुलगा बलभद्र हा शिक्षण पूर्ण करून राज्‍यात परत आला होता. राजकुमार बलभद्रने महालाच्‍या सुरक्षेच्‍या कारभार स्‍वत:कडे घेतला होता. त्‍याने सैनिकांना आज्ञा केली चार-चार सैनिकांची तुकडी बनवून पहारा द्या. योगायोगाने त्‍या रात्री कोणत्‍याही सैनिकाची हत्‍या झाली नाही. तेव्‍हा राजकुमाराने सेनापतीला म्‍हटले,'' असे वाटते की हत्‍या करणारा घाबरला आहे. आता ही सुरक्षा व्‍यवस्‍था भंग करा.'' सेनापतीने विरोध केला. परंतु राजकुमाराने आपले म्‍हणणे सिद्ध करण्‍यासाठी राजमहालाच्‍या पाठीमागील बुरुजावर एक सैनिक तैनात करण्‍यास सांगितले. खुनी त्‍याला मारण्‍यासाठी गेला. त्‍याने सैनिकावर वार केला. परंतु लपुन बसलेल्‍या राजकुमाराने त्‍याला पकडले. तो खुनी सेनापती निघाला. त्‍याने कबुल केले की की शेजारील राज्‍याच्‍या राजाने त्‍याला कुशलगडला जिंकल्‍यावर अर्ध्‍या राजाचा राजा बनविण्‍याचे आमिष दाखविले होते. राजाने सेनापतीला कैद करून देहदंडाची शिक्षा दिली.

तात्‍पर्य :- कधी कधी बाहेरच्‍या लोकांपेक्षा आपल्‍या जवळचे लोकच आपल्‍याला दगा देत असतात. तेव्‍हा बाहेरच्‍या दगाफटका तपासताना जवळच्‍या लोकांनाही तपासले पाहिजे. अति लोभापायी विश्‍वासपात्र लोकही दगा देतात. 
______________वर्तमानपत्रातून संग्रहित _______________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा