गुरुवार, २६ मार्च, २०२०

सुखाचे भांडार(कथा)

🌹🌹🌹🌹सुखाचे भांडार(कथा)🌹🌹🌹🌹🌹
माझे शिक्षण पूर्ण झाले आणि मी घरी बसून होतो. येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाच्या नजरेत एक कुणीही न विचारावा असा प्रश्न निर्माण झालेला दिसत होता की शिक्षण पूर्ण करण्यासाठी इतका पैसा, वेळ खर्च झाला आहे आणि तू घरी बसून काय करतो आहे. मला सांगा की आजकाल नोकरीच्या शोधात अनेकजण आहेत आणि प्रत्येकाला नोकरीची आवड असते असे नाही. काहींना व्यवसाय, धंदा, उद्योग यांची गणिते सोडवायला आवडतात. मी ही एक त्यातलाच एक. अगदी परिस्थिती गरीबीची आहे, दारिद्रय़ ओसंडून वाहत आहे, खाण्यापिण्याचे वांदे आहेत अशी काही आमच्या घरची परिस्थिती नाही. मध्यमवर्गीय घरात जशी परिस्थिती असते तशीच आमच्या घरची परिस्थिती आहे. वडील नोकरीत, आई गृहिणी, भाऊ शिकतो आहे. आता तुम्ही सगळे म्हणाल की हा सगळा लेखनप्रपंच का मांडला आहे आणि त्याचा अन कथेच्या नावाचा काय संबंध आहे. हा तुमचा सवाल अगदी रास्त आहे की कथेच्या नावाशी माझा या गोष्टीचा संबंध हा माझे शिक्षण पूर्ण झाल्यावरच आला. सगळ्यांना वाटे की मी नोकरी करून स्थिर चलन मिळवण्यासाठी प्रयत्न करावं आणि मला तेवढं व्यापार करावा, दुकान काढावं, शहरातल्या प्रतिष्ठित माणसांबरोबर आपली उठबस वाढावी असं वाटत होते. पण प्रत्येकाने मला आपली बहुमोल मते देण्यास सुरू केली होती. आपल्याला धंदा येत नाही, भांडवल कुठून आणणार का त्याच्यासाठी बापाला कर्जबाजारी करून ठेवणार, मुख्य म्हणजे कशाचा धंदा करणार आणि ते घेणार कोण? हल्ली उमेद वाढविण्यापेक्षा खच्चीकरण करणारेच जास्त झाले आहेत. प्रत्येकाला मी शहाणा आहे हे सिद्ध करण्यासाठी तू मूर्खच आहेस हेच दाखवावे लागते.
जो गाठ पडेल तो प्रत्येक जण मला आपापल्या परीने धंद्याच्या विचारापासून परावृत्त करण्यासाठी प्रयत्नशील होता. यामुळेच घरातही शांतता राहत नव्हती. आईवडील व भाऊ यांच्या हस्तेपरहस्ते सल्ला माझ्याकडे पोहोचवण्यासाठी लोक तयारीत होते. एकेदिवशी रात्री ९ वाजता जेवण करायला बसल्यावर विषय निघाला की काय मग डोक्यातून खूळ गेले की नाही. मी मानेनेच नकार दिला. मग घरात यामुळे वादाला तोंड फुटले. आम्ही काही तुझे दुष्मन आहोत का, मला पैसा मागू नको, बघू बाजारात कोण उभं करतं ते, हो घराच्या बाहेर इत्यादी. मग मी पण चिडलो आणि तडक आहे त्या कपड्यानिशी घर सोडले. कुठे जायचं माहिती नाही पण निघालो. माझी आई, मी मागे वळून परतेन या आशेने दारात उभी होती. पण मी निघालो आणि पोहोचलो ते थेट एका देवळात. कारण जाण्यासारखे एकच ठिकाण आता उरले होते जिथे मला कोणीही सल्ला देणारे नव्हते. तिथेच एका कट्ट्यावर निवांतपणे पहुडलो आणि मनोमन त्या परमेश्वराची आळवणी केली. त्याला म्हटले मी काय करू ते कळेनासे झाले आहे तेव्हा तूच आता मार्ग दाखव. मग मला कदाचित झोप लागली असावी बहुधा. पण नंतर एकदम सुवासिक वास मला येऊ लागला, टाळचिपळ्यांचा व मृदुंगाच्या गजराने मला जाग आली. पाहतो तो काय ज्याच्या दर्शनासाठी शेकडो वर्षे तप करावे लागते, यज्ञयाग, खडतर साधनसिद्धी आचरावी लागते तरी जो भेटेल किंवा नाही असा परमात्मा साक्षात समोर उभा होता. मंद स्मित करत प्रभू म्हणाले, अरे मी काय करू, कुठला निर्णय घेऊ ही अवस्था प्रत्येकाच्या आयुष्यात एकदा का होईना येतेच पण म्हणून कोणी घर सोडतं का रे? आलास ते बरं माझ्या या घरी नाही तर कित्येक लोक टोकाची भूमिका घेऊन मी दिलेला सुंदर नरदेहच संपवून टाकतात. प्रभूंचे बोलणे इतके सुरेल आणि मधाळ होते की आपण फक्त ऐकत रहावे आणि तृप्त होऊन जावे असेच होते. मग देवाच्या चरणांवर मी साष्टांग नमस्कार केला आणि म्हणालो, देवा मला या परिस्थितीतून बाहेर काढा. देव म्हणाले, तुला व्यापार करायचा आहे आणि मला माझ्या मागचा थोडा ताप कमी करायचा आहे. जो येतो, तो देवा मला सुख दे म्हणतो. मग उद्यापासून तू माझा प्रतिनिधी बनून सगळ्यांना सुखाचे वाटप कर. ज्याला जसे पाहिजे तसे सुख तू दे. दुकान, फर्निचर, माल सगळी व्यवस्था मी करतो. तू सकाळी लवकर उठून दुकान उघडून बस. मी गिऱ्हाईक पाठवतो इकडून. मला काहीच अशक्य नाही. तू जा आता. पण देवा यात माझा काय फायदा, मी मानवी वृत्तींवर जागा होतो ना. देव म्हणाले, अरे तुला सुख वाटायचा धंदा उघडून दिलाय मी. तुला धंदा करायचे केवढे मोठे सुख मिळणार आहे आणि ज्याला तू सुख वाटणार त्याबदल्यात तो आशीर्वाद नाही का देणार म्हणजे नफा आणि नफ्यावर नफा. जा उद्या सकाळी तुझ्या घराजवळच "सुखाचे भांडार" या नावाने मी दुकान तयार करून ठेवले आहे. तू फक्त इमानदारीने वाग. कोणाच्या सुखात आपल्या हातून ढवळाढवळ होणार नाही हे बघ.
देव बोलले आणि अंतर्धान पावले. नमस्काराची संधीही मिळाली नाही पुन्हा. मी तसाच घरी आलो आणि झोपलो. सकाळी जाग आली ते आई व बाबांच्या ओरडण्यानेच. ते मला सांगत होते की घराच्या बाजूला एक मोठे दुकान झाले आहे आणि त्यावर तुझे नाव आहे. मी म्हणालो मला माहित आहे. उठलो, सगळे आवरले, देवाच्या पाया पडून आईवडिलांना नमस्कार केला व म्हणालो, माझी व्यवसाय करायची इच्छा आज देवाने पूर्ण केली आहे. मग सहजच खिशात हात घातला असता, खिशात काहीतरी आहे असे जाणवले. काय आहे हे पाहण्यासाठी बाहेर काढून पाहतो तर काय. दुकानाची किल्ली होती आणि त्यावर "सुखाचे भांडार"लिहिलेले होते.
गेलो तडक घराबाहेर आणि पाहिले तर खरोखरीच एक मोठ्ठेच्या मोठे दुकान घराजवळ तयार होते. मनापासून देवाला नमस्कार करून दुकानाची किल्ली कुलूपाला लावली. शटर वर केले, पहिलाच दिवस म्हणून आईवडील सोबतच आले होते. पाहतो तो काय. नजर फिरून जाईल असे फर्निचर, वेगवेगळ्या रंगाची आवरणे असलेले बॉक्स, एक खुर्ची, काचेचे काऊंटर सगळं अगदी देवानं मनाप्रमाणे दिलं होतं. रंगीत बॉक्सकडे बघूनच लक्षात आले की हेच आपल्याला विकायचे आहे. मग गल्ल्याजवळ गेलो, तिथे एक उदबत्ती पुडा होता. पूजा केली आणि मनोभावे देवाला म्हणालो, देवा, सुखाच्या या धंद्यात मला सुखी कर.
आईवडील पूजा झाल्यावर निघून गेले आणि हळूहळू बाजार सुरू झाला. नव्यानेच सुरु झालेल्या या दुकानात गिऱ्हाईक येऊन बघू लागले. सुखाचे भांडार तसे चमत्कारिक नाव असल्याने हेच नाव दुकानाला का दिले आणि मुख्य म्हणजे इतका खर्च करून दुकान सजवले आहे. मग वस्तू काय आहे विक्रीची? असे प्रश्न माझ्यासमोर येऊन पडू लागले. मी म्हणालो, सुख मिळतं या दुकानात, ज्याला जसे पाहिजे तसे सुख देण्यासाठी मी हे दुकान चालू केले आहे. ही बातमी अर्ध्या तासात गावभर पसरली आणि दुकानासमोर ही गर्दी झाली. गर्दी पांगवण्यासाठी पोलीस गाडी आली. रांगा लावल्या गेल्या, पहिल्याच माणसाने मला विचारले की, तुम्ही सुख देणार ते कसं ते सांगा म्हणजे त्याचं मोजमाप काय आहे, दुसरा म्हणाला, बरोबर आहे यांचं आम्ही किती मागितलंय आणि तुमच्याकडे ते माप नसलं तर. म्हणजे अर्धा किलोच्या ऐवजी पाव लिटर घेऊन जा म्हणाला तर तुम्ही. तिसरा माणूस म्हणाला कि हे बघा सुख घरी नेता येणार आहे की नाही हे सांगा पहिल्यांदा, का इथं बसूनच आम्ही आमचं सुख उपभोगायचं आहे. चौथा म्हणाला, त्यापेक्षा एक सुचवू का लहानपणीपासून एक गोष्ट ऐकतोय की सुखी माणसाचा सदरा तो कधीच बघितला नाही तेवढा बाहेर लटकावून ठेवा म्हणजे सुखी माणूस जगात आहे हे तरी समाधान मिळेल. मग स्त्रियांची सुरुवात झाली. पहिली स्त्री म्हणाली, आमच्या सुखाच्या अपेक्षा कमी आहेत म्हणून आम्हाला डिस्काऊंट मिळणार का, दुसरी म्हणाली, ते रंगीत बॉक्स मध्ये जे काही आहे ते आमचेच सुख कशावरून दुसऱ्याचे सुख आमच्या नशिबी तर येणार नाही कशावरून, तिसरी म्हणाली, आमच्या वाटणीचे सुख तिसऱ्याच माणसाला गेले तर परत कसे मिळवायचे आणि आम्हाला सुख आमच्या सोयीने देणार का? कारण सकाळपासून राबतो आम्ही मग दुपारी सुख घेता येईल का दुकानातून. चौथ्या महिलेने चौकशीचा भडिमार केला की हे कितीला, ते केवढ्याला, याचा रंगच का असा. वगैरे वगैरे
असे हजारो प्रश्न घेऊन दिवसभरात अनेक लोक आले आणि गेले. मी रात्री उशिरा दुकान बंद करून घरी गेलो आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा नव्याने वेगळी माणसे आली आणि नवे प्रश्न, नव्या शंका, नव्या चौकशा करून गेली.
असे गेले कित्येक वर्षे झाली आणि आजही मध्य वस्तीत, भर चौकात, आजच नव्यानेच सुरू झाल्यासारखे, चकचकीत माझे "सुखाचे भांडार" हे दुकान सुरू आहे. पण वाईट एका गोष्टीचे वाटते की आजपर्यंत मी दुकानातून एकदाही सुख नेताना कोणालाही बघितलेले नाही. प्रत्येकजण येतो, सुखाची चौकशी करतो आणि जातो. लोकांना जे सुख अनायासे मिळते आहे, ते नको आहे आणि जे मिळत नाही त्याच्या पाठीमागे मात्र सगळेच जण धावत आहेत. तुम्हाला कधीही, कशाचेही, कुठल्याही प्रकारचे जर सुख हवे असेल तर या आमच्या "सुखाचे भांडार" मध्ये. वाजवी किंमतीत सुख देऊ ही खात्री देतो आहे. या बरं का निश्चित!!
(काल्पनिक)
©लेखन
संदीप सुधीर जोशी
पंढरपूर
सदर कथेवर माझा कॉपीराईट असल्याने माझ्या परवानगीशिवाय कोठेही वापरू नये.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा