गुरुवार, २ मे, २०१३

(राजा आणि मंत्री)

(कथा क्र ७१) 


एका सम्राटाला रात्री येत नव्हती, ते फेरफटका मारत असताना आपल्या कक्षाबाहेर आले तर मंत्री महोदय आपल्या हिशोबाच्या वह्या काढून हिशोब तपासत आहेत असे त्यांच्या लक्षात आले. मंत्र्याच्या चेहऱ्यावर कसली तरी चिंता आहे हे महाराजांच्या अनुभवी नजरेने हेरले. महाराजांनी त्यांना या चिंतेचे कारण विचारले तेंव्हा मंत्री म्हणाले, "महाराज ! मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी कर अधिक जमा झाला आहे. पण त्याचे कारण मला समजले नाही" सम्राट म्हणाले,"अहो! हिशोबात काही चूक असेल." मंत्री म्हणाले,"हिशोब अचूक आहे. मी स्वत:तपासला आहे." सम्राट म्हणाले," रात्र जास्त झाली आहे. हि समस्या उद्या सकाळी सोडवा." परंतु मंत्री म्हणाला," उत्पन्न अशा प्रकारे वाढणे साम्राज्यासाठी चिंतेचे कारण आहे. कराची कमतरता सहन करणे शक्य आहे पण अन्यायाची एक पै तिजोरीत जास्त आली तर तिच्यामुळे साम्राज्याला तळतळाट लागू शकतो. महाराज ! कुणा गरीबाचा तळतळाटाचा पैसा चुकून जरी आपल्या तिजोरीत पडला तर तुम्हाला आणि मला आपल्या दोघांना आवडणार नाही. यामुळे मी तो हिशोब तपासत आहे." आता सम्राटही गंभीर झाला आणि मंत्राच्या समोर बसला. बराच वेळ विचार केल्यावर मंत्री म्हणाला ,"महाराज! उन्हाळा जास्त झाल्याने नदीची पाणी पातळी खालावली आहे. त्यामुळे काठावरच्या जमिनीला शेतकऱ्यांनी कुंपण घातले. शेतकऱ्यांनी पिके कमी घेतली पण सरकारचा कर बुडवायचा कसा? या विचाराने त्यांनी सरकारात धन जमा केले. त्यामुळे जास्त धन गोळा झाले." यावर राजा म्हणाला,"जर दुष्काळाची परिस्थिती असेल तर त्या गरीब शेतकऱ्यांनी जमा केलेला कर आपल्या तिजोरीमध्ये ठेवून मला पापाचा धनी व्हायचे नाही. गरीब शेतकऱ्यांना शेतीसाठी मदत म्हणून तोच पैसा परत करा." सम्राटाच्या आज्ञेचे पालन करण्यात आले. पुढील वर्षी त्या राज्यात भरपूर पाऊस झाला. जनतेचे आशीर्वाद फळाला आले.


तात्पर्य-सर्वांचे हित जाणणारा, प्रेम, आत्मीयता व कठीण प्रसंगात योग्य साथ देणारी व्यक्तीच योग्य प्रकारे सत्ता चालवू शकते. 

वर्तमानपत्रातून संग्रहित 

(कु-हाड आणि दांडा)

(कथा क्र ७०)


एकदा कु-हाड आणि लाकडाचा दांडा यांच्यामध्ये वादविवाद सुरु झाला. दोघेही स्वत:ला अतिशय शक्तिशाली असल्याचे सांगत होते लाकडाचा दांडा नंतर शांत झाला. मात्र कु-हाडीची बडबड मात्र अखंडपणे चालूच होती. कु-हाडीला प्रचंड अहंकार होता.ती रागाच्या भरात काय वाटेल ते बोलत सुटली होती,"अरे लाकडाच्या दांडक्या ! तू स्वत:ला काय समजतोस? तुझी शक्ती माझ्यापुढे पाणी भरते, मी ठरवले तर मोठमोठे वृक्ष मी सहज कापून काढते, तुझ्यासारख्या दांड्याने माझ्याशी वैर घेणे चांगले नाही. तू माझी बरोबरी करू नको." लाकडाचा दांडा कु-हाडीचे अहंकारी सुरातील बोलणे मन लावून ऐकत होता. काही काळ बडबड केल्यावर कु-हाड शांत झाली मग लाकडाचा दांडा बोलू लागला,"तू जे म्हणते आहेस ते सर्व खरे आहे. तू झाडे तोडू शकतेस, तुझी शक्ती माझ्यापेक्षा जास्त आहे. हे सगळे खरे आहे पण तू एका गोष्टीकडे लक्ष दिले नाहीस ते म्हणजे तू वरीलपैकी कोणतेच काम एकट्याने करू शकत नाहीस. तुला प्रत्येक गोष्टीत माझ्या सहकार्याची गरज हि लागतेच. तू कोणतेच काम एकटीच्या जीवावर कधीच करू शकणार नाही हे तुला माहित असतानासुद्धा तू नको त्या शक्तीचा गर्व बाळगून आहेस. तेंव्हा स्वत:ला यापासून वेळीच सावर अन्यथा तुला कुणी किंमत देणार नाही." कु-हाडीला तिची चूक समजली व तिने दांड्याची माफी मागितली.

तात्पर्य-सहकार्य भावना महत्वाची असते. अहंकारातून सहकार्य भावनेला जर तडा गेला तर काम करता येणे अशक्य आहे. परस्परसंबधी आदरभाव ठेवणे गरजेचे आहे.

वर्तमानपत्रातून संग्रहित