सोमवार, २२ एप्रिल, २०१३

(आत्म्याचा संवाद)

(कथा क्र.६६) 

एकदा अकबर आणि बिरबल यांच्यात बोलणे चालू होते. बोलता बोलता बिरबल म्हणून गेला,"बादशहा! आपण जसे एकमेकांशी बोलतो तसेच आपले आत्मे एकमेकांशी बोलतात." हे ऐकून अकबर लगेच म्हणाला,"असे बोलणे तुला शोभत नाही, एकतर हे सिद्ध कर नाही तर शिक्षेला तयार हो." बिरबलाने आपले बोलणे सिद्ध करून दाखविण्याची तयारी केली. बिरबल व अकबर लगेचच वेषांतर करून ग्रामीण पोशाखात बाहेर पडले. बिरबल मालक तर अकबर बादशहा त्याचा नोकर झाला होता. काही अंतर गेल्यावर त्यांना एक जंगल लागले, समोरच एक लाकुडतोड्या झाडे तोडत होता. त्याला पाहताच बिरबलाने अकबराला विचारले,"हुजूर! या लाकुडतोड्याबद्दल आपले काय मत आहे?" बादशहा म्हणाला, "अरे याला आताच्या आता मारून टाकावेसे वाटत आहे. तुला दिसत नाही का तो फळा फुलांनी बहरलेले हिरवेगार झाड तोडत आहे ते?" बिरबलाने म्हंटले,"आपण त्याच्याजवळ जाऊ" ते त्याच्याजवळ गेले आणि बिरबल लाकूडतोड्याला म्हणाला,"भाऊ! तू हे हिरवेगार झाड का तोडत आहे?" लाकुडतोड्या म्हणाला,"मित्रा ! अरे माझे उदरनिर्वाहासाठी हि झाडे लागतात.राजधानीकडून आलेले दिसताय काय नवीन बातमी?" बिरबल म्हणतो,"अरे अकबर बादशहा या जगात राहिले नाहीत" लाकुडतोड्या म्हणतो," बरे झाले गेला तो अकबर ! बदमाश होता !" या उत्तराने अकबर हैराण झाला पण त्याने नोकराचा वेश घेतल्या कारणाने त्याला काही बोलता येईना. बिरबलाने त्याला पुढे चालण्यास सांगितले. दोघे पुढे गेले तर काही अंतराने एक वृद्ध महिला बकऱ्या चारताना दिसली, बिरबलाने परत अकबराला विचारले,"या महिलेबद्दल तुमचे मत काय?" अकबर म्हणाला,"या म्हाताऱ्या वयात सुद्धा ती बकऱ्या चारत उन्हातान्हात फिरत आहे म्हणजे ती तिच्या कुटुंबासाठी खूप कष्ट घेत आहे." बिरबल काहीच न बोलता वृद्धेकडे अकबराला घेवून गेला. त्याने वृद्धेला विचारले,"आजी तुम्ही या वयात बकऱ्या का चारत आहात?" वृद्ध महिला म्हणाली,"माझ्या कुटुंबाचे पोट या बकऱ्यांवर चालते." त्यानंतर बिरबलाने तिलाही अकबराच्या मृत्यूची बातमी सांगितली, त्याबरोबर वृद्धा मोठ्यामोठ्याने रडू लागली. हे पाहून दोघेही तिथून पुढे गेले. मग बिरबल अकबराला म्हणाला,हुजूर, तुम्ही लाकुद्तोड्याबद्दल गैर शब्द वापरले त्यानेही तसेच शब्द तुमच्याबद्दल वापरले, याउलट वृद्धेच्या बाबतीत तुम्ही चांगले बोलला तिने तुमच्या खोट्या मृत्यूवर खरे दुःख व्यक्त केले. म्हणजेच आपल्याला हे मान्य करावेच लागेल कि तुमच्या आत्म्याने जे विचार प्रकाशित केले त्याचे प्रत्युत्तर समोरच्या अत्म्याकडून मिळाले, खरय ना !" अकबर हसला.

तात्पर्य-सदभावनेतून सदभावना वाढीस लागते. वाईटातून वाईट घडते, त्यामुळे सर्वांसाठी चांगला विचार करा, चांगलेच प्रत्युत्तर मिळेल.

वर्तमानपत्रातून संग्रहित 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा