गुरुवार, ४ एप्रिल, २०१३

(शिकारी आणि कबुतर)


(कथा क्र. ५४) 

एका गावात एक दुष्ट शिकारी राहत होता. तो दररोज जंगलात जावून पशु पक्षांची शिकार करत असे. एकेदिवशी त्याचा जाळ्यात एक कबुतर मादी अडकली, तो तिला मारून खाऊ इच्छित होता. परंतु अचानक पाऊस सुरु झाला. पावसापासून बचाव करण्यासाठी तो एका झाडाखाली थांबला. संयोगाने त्याच झाडाला असलेल्या बिळात हे कबुतर राहत होते. ज्या कबुतर मादीला पकडले होते तिचा पती पत्नीच्या वियोगाने  दु:खी होता. कबुतर मादीने आपल्या पतीला दुखात असलेले पाहिले, ती भावनावश झाली ती कबुतराला म्हणाली," मला या शिकाऱ्याने पकडले आहे, परंतु या वेळी तो आपला अतिथी आहे. तू माझी चिंता सोडून शिकाऱ्याकडे लक्ष दे. शिकारी थंडीत कुडकुडत आहे." कबुतराने झाडाची सुकलेली पाने आणि बारीक फांद्या एकत्र करून शिकाऱ्याजवळ शेकोटी पेटवली. त्यामुळे त्याला ऊब मिळाली, शिकाऱ्याला श्रमामुळे भूकही लागली होती. कबुतराने शिकाऱ्याची भूक भागविण्यासाठी त्या आगीत उडी घेतली. कबुतर मादी आपल्या पतीच्या मृत्यूने दु:खी झाली. हे सर्व पाहून शिकाऱ्याच्या मनात अपराधीपणाची भावना वाढीस लागली. ज्या पक्षांना तो मारून खात होता त्यापैकी एकाने त्याच्यासाठी आपला जीव अग्नीच्या स्वाधीन केला होता व शिकाऱ्यावर उपकार केले होते. हे उपकार फेडण्यासाठी त्याने कबुतर मादीला मुक्त केले. पण कबुतर मादीने पतीच्या आठवणीने व्याकूळ होवून आगीत उडी घेतली. शिकाऱ्याजवळ पश्चाताप करण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता. त्याच्या मूर्खपणाने दोन जीवांचा संसार उध्वस्त झाला होता.

तात्पर्य - माणसाची सुस्त चेतना जागृत करण्याची आज गरज आहे. ज्यामुळे निसर्गाचे नुकसान टाळता येवू शकते.

वर्तमानपत्रातून संग्रहित 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा