बुधवार, २० फेब्रुवारी, २०१३

(भोजन आणि मौन)


(कथा क्र.३५) 

कथा सिद्धार्थाच्या जीवनाशी निगडीत आहे. तेंव्हा ते बुद्धत्वाला गेले नव्हते आणि ते निरंजना नदीच्या काठी जंगलात वृक्षाखाली ध्यान करीत असत. सिद्धार्थ ध्यान केल्यानंतर जवळच्या गावात जावून भिक्षा मागून आणत असत. काही दिवसानंतर त्यांनी भिक्षा मागायला जाणे बंद केले. कारण एका गावात गावप्रधानाची छोटी मुलगी सुजाता त्यांना भोजन आणत असे. सिद्धार्थाना ती मोठ्या प्रेमाने भोजन देत असे. काही दिवसानंतर त्याच गावातला एक गुराखीही प्रभावित होवून सिद्धार्थांकडे येवू लागला. त्याचे नाव स्वस्ति होते. एके दिवशी सिद्धार्थ स्वस्तिबरोबर चर्चा करीत होते. तेवढ्यात सुजाता भोजन घेवून आली. भोजन सुरु करताच त्यांनी चर्चा बंद केली. भोजन संपेपर्यंत ते गप्पच होते. तेथे शांतता पसरली. स्वस्ति या सिद्धार्थांच्या वागण्याने हैराण झाला. त्याने सिद्धार्थांचे भोजन आटोपल्यावर विचारले,"गुरुदेव ! मी आल्यानंतर आपण भरपूर चर्चा केली पण भोजनाच्या वेळी आपण एकही शब्द बोलला नाहीत, याचे कारण काय?" सिद्धार्थ म्हणाले,"भोजन निर्मिती मोठ्या कष्टाने होते. शेतकरी जमिनीची मशागत, नांगरणी करतो, बी पेरतो, रोपांची देखरेख करतो, धान्य तयार होते. त्या धान्यासाठी आपण धन खर्चतो, धान्य घरी आल्यावर ते निवडून टिपून त्याचे सुंदर असे अन्न तयार होते. घरातील महिला सुग्रास असे भोजन तयार करते. इतक्या कष्टाने तयार झालेल्या अन्नाचा आनंद आपण शांततेने तेंव्हाच घेवू शकू जेंव्हा आपले मन शांत असेल. त्यामुळे माझे मन शांत राहण्यासाठी मी भोजन करताना शांत राहतो आणि त्यामुळे माझे मन शांत राहते आणि अन्नाचा अपमान न होता मी त्या कष्टाने मिळवलेल्या सुग्रास अन्नाचा आनंद घेवू शकतो." 

तात्पर्य - शांततेत केलेले भोजन हे न केवळ भूक मिटविते तर मानसिक आनंद आणि सात्विक ऊर्जाही देते . 


=============
वर्तमानपत्रातून संग्रहित
=============


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा