सोमवार, ४ फेब्रुवारी, २०१३

(कौतुक आणि शिक्षा)


(कथा क्र.३०) 

एक नावाजलेली शाळा होती. सगळे शिक्षक कामसू आणि विद्यार्थीप्रिय होते. चित्रे गुरुजी हे चित्रकला शिक्षक होते. विद्यार्थ्यांना चित्रकला शिकविण्यात त्यांचा हातखंडा होता. त्यांच्या वर्गात सगळे विद्यार्थी चांगले होते फक्त एक सोडून. तो विद्यार्थी जरा वेगळा होता. तो काम करणे यापेक्षा काम टाळणे, चुकारपणा करणे यासाठी प्रसिद्ध होता. एकदा असं झालं कि, चित्रे गुरुजींनी मुलांना धावत्या आगगाडीचं चित्र काढायला सांगितलं. सगळ्या मुलांनी भराभर कागद घेतले, पेन्सिली, खोडरबर, रंगीत खडू घेवून चित्र काढण्यास सुरुवात केली. चित्रे गुरुजींनी चित्र तासामध्ये पूर्ण करायला सांगितलं होतं. धावती आगगाडी काढायची म्हणजे रूळ, इंजिन, गाडीचा दाबा, पिस्टन, डब्यांच्यामधील जोडणी काढायला हवी होती मात्र आपले हे चुकार महाशय मात्र गप्पच बसले होते. गुरुजींनी विचारले, "कारे तुला चित्र काढायचं नाही का?" तो म्हणाला "हो! काढणार आहे. मी वेळेतच चित्र पूर्ण करणार आहे." तास संपायला दहा मिनिटे शिल्लक होती. त्याने भराभर चित्र काढले, तासाची घंटा वाजली, सर्व मुलांनी चित्र पूर्ण करून दिली, चुकार मुलानेही चित्र पूर्ण करून दिलं. त्यांना चित्र असं काढलं होतं, एक बोगदा काढला होता, या बाजूला रुळाची टोकं आणि गाडीच्या डब्याचा भाग. गुरुजींनी चित्र बघितलं आणि म्हणाले,"अरे मी तर धावत्या गाडीचं चित्र काढायला सांगितलं होतं, मग हे काय काढलस?" चुकार मुलगा म्हणाला,"गाडी धावतेच आहे, पण ती बोगद्यात आहे." गुरुजींनी सर्वाना गुण दिले पण याच्या चित्राला गुण दिले नाहीत, तो म्हणाला, "गुरुजी मला गुण केंव्हा देणार" गुरुजी म्हणाले,"तुझी गाडी बोगद्यातून बाहेर आल्यावर मी तुला गुण देईन" गुरुजींनी त्याच्या कल्पनाशक्तीचे कौतुक केले पण कामचुकारपणाबद्दल शिक्षा हि केली. 

तात्पर्य- कोणतेही काम मन लावून करावे.
वर्तमानपत्रातून संग्रहित

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा