सोमवार, २८ ऑक्टोबर, २०१३

सुभाषचंद्र बोस

 कथा क्र.141 

कटकमध्‍ये जानकीनाथ बोस हे एक वकील होते. एका रात्री ते, त्‍यांची पत्‍नी व मुलगा सुभाष आपल्‍या घरात झोपले असता काही वेळाने त्‍यांच्‍या पत्‍नीला जाग आली व तिने पाहिले आपला मुलगा सुभाष जमिनीवर झोपला आहे. त्‍याला थंडी वाजेल अशी तिला भिती वाटू लागली. पत्‍नीने मुलाला जागे केले व विचारले,'' बेटा सुभाष, तुला असे जमिनीवर का झोपावेसे वाटले'' सुभाषने उत्तर दिले,''आई, आपले पूर्वज असणारे साधु-संत,महात्‍मे, ऋषीमुनी हे सारेच जमिनीवर झोपत असत म्‍हणून मी ही जमिनीवर झोपणार आहे.'' आई म्‍हणाली,'' बेटा, ते महान होते आणि वयानेही मोठे होते. तुझे वय जमिनीची कठोरता सहन करणार नाही तू बाजेवर येऊन झोप.'' आई आणि मुलाच्‍या या चर्चेने जानकीनाथ बोस जागे झाले आणि त्‍यांनीही सुभाषला विचारले,'' सुभाष तुला जमिनीवर झोपायला कुणी शिकविले.'' सुभाष म्‍हणाला,''बाबा, गुरुजी सांगत होते साधु-संत,महात्‍मे, ऋषीमुनी हे सारेच महापुरुष होते. तसेच ते जमिनीवर झोपत असत म्‍हणून मी ही जमिनीवर झोपणार आहे. मला महापुरुष व्‍हायचे आहे.'' जानकीनाथ बोस यांनी सुभाषला समजावले की,'' बेटा, जमिनीवर झोपून कुणी महान होत नसते तर कठोर तप, साधना आणि पीडीत मानवतेच्‍या सेवेतून व्‍यक्ती महान होते. आचरणात शुद्धता ठेवली तर मनुष्‍य महान होतो.'' सुभाषला वडीलांचे म्‍हणणे पटले व त्‍याने त्‍याचप्रमाणे वर्तन ठेवले व एक महान क्रांतीकारी हिंदूस्‍थानला मिळाला त्‍याचे नाव सुभाषचंद्र बोस. राष्‍ट्रासाठी संपूर्ण जीवन व्‍यतीत करून, समर्पण कसे असावे याचा संदेश देणारे जीवन त्‍यांनी जगले व वडीलांची शिकवण आचरणात आणली.


तात्‍पर्य- त्‍याग आणि समर्पणातूनच देशहित जपले जात असते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा