बुधवार, ३० ऑक्टोबर, २०१३

दोन मित्र


कथा क्र.142

दोन मित्र होते. एक फारच धार्मिक वृत्तीचा होता. तो नेहमी देवपूजा, जप यात मग्‍न असायचा तर दुसरा त्‍याचे विरूद्ध टोक होता. तो कधीच मंदिरात जात नसे, घरीही पूजाअर्चा करत नसे. दान-पुण्‍यपाप यावर त्‍याचा विश्‍वास नव्‍हता. त्‍याने जीवनात अधिक पैसे मिळविण्‍याचे ठरविले होते. तो रात्रंदिवस पैसे कमावण्‍यात गुंग झाला होता. भौतिक सुविधांनी त्‍याने आपले जीवन संपन्‍न बनविले होते. पण त्‍याच्‍या जीवनात सुख व संतोष हे नावाला सुद्धा नव्‍हते. याउलट आस्तिक मित्र आपल्‍या गरीबीतच सुखी,समाधानी होता. तो तुटपुंज्‍या साधनातच समाधानी राहत असे. नेहमी ईश्र्वरभक्तीत रममाण होता. एके दिवशी नास्तिक मित्र त्‍याला भेटायला त्‍याच्‍या घरी आला व त्‍याचे साधे घर पाहून तो म्‍हणाला,''तुझ्या त्‍यागाची जितकी प्रशंसा करावी तितकी कमीच आहे. तू तर ईश्र्वरभक्तीमध्‍ये सा-या जगाला सोडून दिलेस मात्र तरीही खुश आहेस'' हे ऐकून आस्तिक मित्र म्‍हणाला,''मित्रा, मी आपल्‍या गरीबीत फार आनंदी आहे, पण तुझा त्‍याग तर माझ्यापेक्षाही मोठा आहे कारण तू तर पैशासाठी, सुखसोयीसाठी ईश्र्वरालाच त्‍यागले आहेस, तूच सांग तू खुश आहेस ना'' आपल्‍या मित्राचे हे बोलणे नास्तिक मित्राच्‍या जिव्‍हारी लागले. त्‍याने विचार केला की आपण हे सर्व धन मिळवतो पण आपल्‍याला सुख का लागत नाहीये, समाधान का मिळत नाही. पण गरीब असणारा आस्तिक मित्र मात्र सुखात आहे, आनंदात आहे याचे कारण त्‍याला कळाले. त्‍या दिवसापासून त्‍याच्‍या जीवनाची दिशाच बदलून गेली.

तात्‍पर्य- जीवनात अनेक गोष्‍टी अनुकुल प्रतिकुल बनविणारी कोणीतरी सत्ता ही मानवाला मानावीच लागते. त्‍याची आठवणसुद्धा काहीवेळा मनाला सूचक अशा सूचना देऊन आपले वर्तन बदलण्‍यास मदत करते. 

__________________
वर्तमानपत्रातून संग्रहित 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा