रविवार, १ डिसेंबर, २०१३

(ध्यान, प्रेम, शांतता)

कथा क्र.148

एकदा एक गुरु शिष्य जंगलातून गावाकडे जात असतात. जंगलात अनेक हिंस्त्र प्राणी राहत असतात. जंगलातून जाताना त्यांच्या अचानक लक्षात येते कि कुणीतरी त्यांचा पाठलाग करीत आहे. शिष्य मागे वळून पाहतो त्याची तर बोबडीच वळते. त्यांच्या मागे एक भलामोठा वाघ असतो. तो विचार करतो आपण पळून जावे का? पण त्याचा आपल्या गुरुवर विश्वास असतो. गुरु जे करतील ते आपणही करावे या विचाराने तो शांत बसतो.तो गुरुना विचारतो आता आपण काय करायचे. गुरु शांत आणि प्रसन्न मुद्रेने त्याला उत्तर देतात कि आपण जर आता पळालो तर त्या वाघाचा वेग आपल्यापेक्षाही जास्त आहे.आपण त्याचा प्रतिकार करायचा प्रयत्न केला तर त्याची शक्ती आपल्या दसपट जास्त आहे मग आपण विरोध करून तरी काय उपयोग? आपण केवळ त्याला सामोरे जावू. शिष्य अजूनच घाबरतो. गुरु मात्र निश्चिंत असतात. ते ध्यान करण्यास सुरुवात करतात. वाघ त्या दोघांच्या आणखी जवळ येतो. शिष्याची दातखीळ बसते त्याचे पाय थरथरु लागतात. तो चक्कर येवून पडतो. नंतर त्याला जाग येते तेंव्हा त्याचे गुरु त्याच्या डोक्याशी ध्यान लावून बसलेले त्याला दिसून येतात. तो विचारतो आपण दोघेही जिवंत कसे? गुरु त्याला म्हणतात, आपल्या मनात जर शांतता आणि प्रेम असेल तर ध्यानाच्या माध्यमातून आपण तो परिणाम वातावरणातही निर्माण करू शकतो. वाघाला पाहून तू घाबरलास पण मी माझ्या मनातील शांतता आणि प्रेम ध्यानाच्या माध्यमातून वाघाच्या मनात प्रसारित केले तो जवळ पण त्याला माझ्या मनातले प्रेम जाणवले व आपल्याला धोका नाही हे जाणवून तो दूर निघून गेला.

तात्पर्य- प्रेम आणि शांतता हे सहज उपलब्ध असणारे मानवी गुण आहेत. याचा वापर केला गेला पाहिजे.

______________वर्तमानपत्रातून संग्रहित ______

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा