मंगळवार, १९ मार्च, २०१३

(बुद्धीचा योग्य वापर)


(कथा क्र. ४५)

एक राजा कुशल प्रशासक होता. प्रजेचे सुख- दु:ख जाणून घेण्यासाठी तो साधारण वेशभूषा करून फिरत होता. एक दिवस जेंव्हा तो नगरातून जात होता तेंव्हा त्याला काही घोडेस्वार आपल्याकडे येताना दिसले, ते चोर असून आपल्याला लुटण्यासाठी येत आहेत असे राजाने हेरले. धाडसी राजा आता घाबरून जाण्याऐवजी लढण्यासाठी तयार झाला. त्याचवेळी त्याच्या घोड्याचा पाय खड्ड्यात अडकला. घोडा थोडासाही इकडे तिकडे हळू शकत नव्हता आणि चोर तर जवळ आले होते. तेवढ्यात तेथे काही तरुण आले. परिस्थिती ओळखून त्यांनी चोरांवर प्रतिहल्ला केला व हाकलून लावले. राजा यामुळे खुश झाला. त्याने त्या तरुणांना आपली ओळख दिली व बक्षीस म्हणून काही ना काही मागण्यास सांगितले. एका तरुणाने धन मागितले, दुसऱ्याने घर, तिसऱ्याने शेती, चौथ्याने सरपंचपद, पाचव्याने गावापर्यंत रस्ता बनवून मागितला आणि सहाव्याने म्हंटले, "महाराज ! मला काही देण्यापेक्षा तुम्हीच माझ्या घराचा पाहुणचार स्वीकारण्यासाठी माझ्या घरी वर्षातून दोन वेळा यावे." राजाने सर्वांच्या इच्छा पूर्ण केल्या व सहाव्या तरुणाला घरी येण्याचे वचन दिले. राजा त्याच्या घरी गेला तेंव्हा त्याचे घर खूप जीर्ण झाले होते. राजाला ते पाहवले नाही ते त्याने बांधून देण्याची आज्ञा केली. तसेच येण्याजाण्यासाठी चांगला रस्ता करून दिला. राजा हा पाहुणा म्हणून येत असल्याने त्याचा गावातील गावातील सन्मान वाढला. प्रतिष्ठा वाढली, राजाच्या जवळचा असल्याने राजदरबारी त्याचे म्हणणे मांडता येवू लागले. राजाने प्रत्येक वेळी त्याला काही ना काही वस्तू भेट दिल्याने त्याची श्रीमंती वाढत गेली. त्याच्या अक्कल हुशारीने तो गावातील प्रतिष्ठित नागरिक बनला. 


तात्पर्य- योग्य संधी मिळेल तेंव्हा बुद्धीचा वापर योग्य पद्धतीने केल्यास चांगले लाभ पदरात पडून घेता येतात. 
वर्तमानपत्रातून संग्रहित

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा