बुधवार, २२ मे, २०१३

(महत्व)

(कथा क्र.८०)

एका आश्रमात एक महात्मा राहत होते. सोबत त्यांचे काही शिष्यपण होते. काही विशिष्ट मुद्द्यावर चर्चा सुरु होती. महात्मा त्या सर्वांचे विचार ऐकत होते आणि आणि आपले विचारही व्यक्त करत होते. या दरम्यान महात्म्याच्या नजरेस काही तरी पडले व ते त्या दिशेने जावू लागले. त्यांनी ती पडलेली वस्तू उचलून घेण्यास एका शिष्याला सांगितले. दुपारी जेंव्हा महात्मा आपल्या कुटीत परत आले तेंव्हा त्यांनी त्या शिष्याला बोलावले व सकाळी उचलून घेतलेल्या कापसाबद्दल त्याला विचारले असता तो शिष्य म्हणाला,"तुम्ही सांगितलेला कापूस मी उचलला खरा पण काही काळाने मी कचरा समजून तो फेकून दिला. आता तो कचराकुंडीत असेल. " महात्मा म्हणाले,"अरे ! मी या कापसाऐवजी तुला धन किंवा सोने दिले असते तर असेच कचराकुंडीत टाकले असते का? तो कापूस बाहेर उघड्यावर पडला याचा अर्थ कापूस जिथे ठेवला आहे तेथुन कापूस बाहेर वाऱ्याने किंवा अन्य कोणत्या कारणाने बाहेर कसा पडला? शेतकऱ्याने इतक्या कष्टाने तयार केलेल्या कोणत्याही गोष्टी अशा जर थोड्या थोड्याने जर वाया जावू लागल्या तर आपल्या बरोबर समाजाचेहि नुकसान यातून होणार आहे. छोट्या छोट्या गोष्टी जर आपण फेकून द्यायला लागलो तर त्यातून आपलाच तोटा आहे. कापसाचा तुकडा असेना का पण ज्याने तो कातून ठेवायच्या ऐवजी बाहेर टाकला त्याने कापसाचा तुकडा नाही तर भविष्यात निर्माण होणारे धन फेकून दिले आहे. लक्षात ठेव ! कष्टाने धन मिळते, पण मिळालेल्या धनाचा योग्य वापर करणे, गुंतवणे हेही तितकेच महत्वाचे आहे." 

तात्पर्य- धन हे जरी उपभोगासाठी असले तरी ते चुकीच्या मार्गाने व्यर्थ रीतीने खर्चले जावू नये. छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा महत्वपूर्ण असतात.

वर्तमानपत्रातून संग्रहित 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा