बुधवार, ८ मे, २०१३

(लालसा)

(कथा क्र.७३) 

एका गावात चोर चोरी करण्याच्या उद्देशाने आला होता. इकडे तिकडे फिरत असता गावकऱ्यांनी त्याला पकडला आणि झाडाला बांधून घातले. मग गावकरी विचार करू लागले याला काय शिक्षा द्यावी का गावातील मुख्य माणसाला विचारावे? या विचारातून असे ठरले कि मुख्य माणसाला बोलावून आणायचे आणि चोराला शिक्षा करायची. सगळे गावकरी त्या चोराला एकटे त्या झाडाला बांधून मुख्य माणसाला बोलावण्यास गेले. काही वेळ गेल्यावर त्या रस्त्याने एक मेंढपाळ जात होता, त्याने त्या चोराला झाडाला बांधलेले पाहिले, त्याला उत्सुकता वाटली त्याने त्या चोराला विचारले,"तू कोण आहेस? तुला असे कोणी बांधून ठेवले आहे? तू काय गुन्हा केला आहेस?" चोराने विचार केला हि सुटायची चांगली संधी चालून आली आहे. चोर म्हणाला, "अरे काय सांगू मित्रा ! मी आहे एक फकीर ! इथे काही चोर आले होते. लोकांची लुट करून ते धन मिळवतात आणि त्याचे पाप लागायला नको म्हणून त्यातील काही धन दान करतात.गेल्या अनेक दिवसांपासून त्यांना कुणी फकीर दानासाठी गाठ पडला नव्हता. ते धन घ्या म्हणत होते पण कुणी त्यांचे धन घेतच नव्हते. अशातच त्यांनी त्यांनी मला दान घ्यावे म्हंटले पण मी नकार देताच त्यांनी मला मारहाण केली व या झाडाला बांधून ठेवले आहे व ते परत येथे येवून मला धनदान करूनच मग पुढे जाणार आहेत." हे ऐकताच मेंढपाळाच्या मनात धनाच्या बाबतीत लोभ निर्माण झाला. तो चोराला म्हणाला,"भाऊ! तू फकीर ! तुला धनाचा काय फायदा! तू ते घेणारही नाहीस, त्यापेक्षा आता अंधाराची वेळ झाली आहे तू त्याचा फायदा घे आणि पळून जा. तुझ्या जागेवर मला बांधून ठेव. अंधार असल्याने ते तू समजून मला धन देतील आणि माझी गरिबीपण हटेल." चोराने तसेच केले. आपल्या जागी मेंढपाळाला बांधून तो पळून गेला. तिकडे गावकरी मुख्य माणसाकडून चोराला समुद्रात फेकून देण्याचा आदेश घेवून आले. त्यांनी चोराची शहानिशा न करता व अंधार असल्याने चोराचा चेहरासुद्धा न पाहता त्याला समुद्रात फेकून दिले. अशा त-हेने धनलोभाने एका गरीबाचा जीव गेला.

तात्पर्य-कोणत्याही गोष्टीचा लोभ चांगला नाही, लोभामुळे आत्मघात होण्याची शक्यता असते. त्यापासून दूर राहणे हेच बरे.! बरोबर आहे ना !

वर्तमानपत्रातून संग्रहित 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा