रविवार, १६ जून, २०१३

(लोभाचे बळी)

(कथा क्र.९५)

एकदा एका व्यक्तीने घरी कार्यक्रमाचे आयोजन केले आणि त्यासाठी त्याने नातेवाईक, शेजार्‍यांना आमंत्रित केले होते, कारण अशा वेळेला भोजनासाठी अधिक भांड्याची गरज भासते. त्या व्यक्तीने आपल्या सर्व शेजार्‍यांकडून भांडी मागवली आणि सर्वांना जेवण दिले. दुसर्‍या दिवशी जेंव्हा शेजार्‍यांची भांडी परत केली तेंव्हा त्याने त्या भांड्यासोबत एक छोटे भांडे दिले. जेंव्हा शेजार्‍याने याचे कारण विचारले तेंव्हा त्याने म्हटले की "काल रात्री तुमच्या भांड्याने छोट्या भांड्यास जन्म दिला. त्यामुळे ही छोटी भांडी मी कशी ठेवून घेवू?" शेजारी प्रसन्न झाले. त्यांना आयतेच प्रत्येक भांड्याबरोबर एक लहान भांडे मिळाले होते. काही दिवसानंतर तोच माणूस जेव्‍हा आपल्‍या येथे भोजन आहे असा बहाणा करून शेजा-यांकडे भांडी मागण्‍यासाठी गेला तेव्‍हा शेजा-यांनी त्‍याला मोठया आनंदाने भांडी दिली. कारण शेजा-यांना याचा पूर्वानुभव होताच. काही जणांनी तर याला घरातील एकूण एक भांडी दिली. दुसर्‍या दिवशी त्या भांडे मागून नेणा-या व्यक्तीने भांडी परत केली नाहीत तेंव्हा सर्व लोक त्‍याच्‍या घरी आले आणि त्‍याला विचारू लागले की आमची भांडी कोठे आहेत. तेव्‍हा त्‍याने रिकामी खोली उघडून दाखविली व म्‍हणाला,’’ सर्व भांडी ईश्र्वराने नेली. सर्व भांडी मृत पावली. मी आता कोठून तुमची भांडी परत देऊ’’ सर्व लोक डोक़याला हात लावून बसले. कारण पहिल्‍यांदा जेव्‍हा त्‍याने भांडी नेली तेव्‍हा त्‍यासोबत एक भांडे जास्‍त दिले, तेव्‍हा लोभामुळे कोणी त्‍याला विरोध केला नाही, आता सर्वच भांडी गेली.

तात्‍पर्य- लोभाला बळी पडून आपण चुकीच्‍या गोष्‍टीला विरोध करत नाही मात्र जेव्‍हा हानी होते तेव्‍हा मात्र आपण विरोध करतो. लोभ हा सर्वथा वाईट आहे.

वर्तमानपत्रातून संग्रहित 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा