सोमवार, १० जून, २०१३

(शेठजी आ‍‍‍णि त्‍याचा मित्र)

(कथा क्र.९२) 


एका शेठजवळ अपार संपत्‍ती होती, एके दिवशी त्‍याच्‍या मनात विचार आला की एक भव्‍य शिवमंदिर बनवावे. सहा महिन्‍यात मंदिर बनवून पूर्ण तयार झाले. मंदिर बनवून जे धन शिल्‍लक राहिले ते धन त्‍याने मंदिराच्‍या घुमटात गुप्‍त रितीने ठेवले. या गोष्‍टीचा उल्‍लेख त्‍याने आपल्‍या डायरीमध्‍ये करून ठेवला. त्‍यानंतर तो तीर्थयात्रेला निघुन गेला. परंतु तो रस्‍त्‍यातच मरण पावला. शेठला चार मुले होती. शेठजीच्‍या मृत्‍युनंतर काही दिवसातच त्‍यांना पैशाची चणचण भासु लागली, तेंव्‍हा त्‍यांनी आपल्‍या वडीलांची डायरी तपासायला सुरुवात केली. त्‍या डायरीत त्‍यांना घुमटातल्‍या धनाचा उल्‍लेख असलेली नोंद त्‍यांना पाहायला मिळाली. त्‍यात असेही लिहीलेले होते की, चैत्र शुद्ध नवमीला धन घुमटात ठेवण्‍यात आले आहे, त्‍या मुलांनी घुमट तोडला मात्र त्‍यात धन निघाले नाही. तेव्‍हा ते आपल्‍या वडिलांच्‍या बुजुर्ग मित्राकडे आले, आणि समस्‍या सांगितली. वडीलांच्‍या त्‍या बुजुर्ग मित्राने त्‍या चारही मुलांना चैत्र शुद्ध नवमीला रात्री बारा वाजता त्‍या ठिकाणी खोदायचे आहे जिथे तुमच्‍या वडीलांनी धन ठेवले आहे असे सांगितले, चंद्राच्‍या प्रकाशात घुमटाची सावली जेथे पडली होती, तेथे रात्री या म्‍हाता-या व्‍यक्तिने खोदायला स्‍वत: आधी सुरुवात केली आणि मग मुलांना खोदायला सांगितले. जेथे सावली पडली होती तेथेच बरोबर धन सापडले, मुलांना आनंद वाटला. मुलांनी बुजुर्ग व्‍यक्तिला धन्‍यवाद दिले, त्‍या धनाच्‍या मदतीने मुले व्‍यापारात पुन्‍हा उभे राहिले तसेच आपल्‍या पित्‍याच्‍या बुद्धीलाही दाद दिली.

तात्‍पर्य- वृद्धांचा अनुभव हा संपन्‍न असतो आणि तो नव्‍या पिढीसाठी मार्गदर्शक असतो.

वर्तमानपत्रातून संग्रहित 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा