मंगळवार, २६ फेब्रुवारी, २०१३

(कष्टाची कमाई)


(कथा क्र. ३७) 

ग्रीसमध्ये हेलाक नावाचा एक धनवान आणि लोभी माणूस राहत होता. आपल्या दुकानावर येणाऱ्या प्रत्येक माणसाला ठकवणे त्याचे नित्याचे काम झाले होते. त्यातून तो भरपूर धन जमा करायचा. मात्र ते धन त्याच्याकडे टिकत नसे. कधी आजारात खर्च होत असे तर दुकानदारीत कधी खोट येत असे. हे पाहून त्याची सून त्याला समजवायची कि बेइमानीचे पैसे कधीच टिकत नसतात. परंतु हेलाक तिचे कधीच ऐकत नसे. एके दिवशी त्याच्या मनात विचार आला कि सून जे म्हणते आहे त्याची परिक्षा घेवून बघू. त्याने इमानदारीने धन जमा करून त्याचे एक सोन्याचे गंठण बनवले व ते एका कपड्यात बांधले व त्यावर स्वत:चे नाव टाकून चौकात ठेवून आला. बरेच लोक येत जाता त्या कपड्याकडे बघत पण कोणीही उचलून नेले नाही. सर्वांच्या पायात लागत होते म्हणून एका माणसाने ते तसेच उचलले आणि तळ्यात फेकून दिले. तळ्यातील एका मगरीने ते गिळले. काही दिवसांनी एका मच्छिमाराला जाळ्यात ती मगर सापडली. त्यांनी तिचे पोट फाडले तेंव्हा तिच्या पोटात कापडात बांधलेले सोन्याचे गंठण निघाले, मच्छीमारांनी हेलाकचे नाव त्यावर पाहिले व बक्षिसाच्या आशेने गंठण त्याला आणून दिले. अनेक महिन्यांनी आपले सोन्याचे गंठण मिळालेले पाहून तो खुश झाला. आता त्याचा सूनबाईच्या बोलण्यावर विश्वास बसला कि इमानदारीने मिळवलेले धन कुठेच जात नाही आणि बेइमानिचा पैसा कधीच टिकत नाही. त्याने खुश होवून त्या मच्छिमारांना चांगले बक्षीस दिले व सुनेला शाबासकी दिली. 



तात्पर्य- कष्टाने कमावलेल्या धनाने मानसिक शांतता, सुख मिळते तर   बेइमानीने मिळवलेल्या धनाने अनेक वाईट गोष्टी घडून येतात.
वर्तमानपत्रातून संग्रहित

रविवार, २४ फेब्रुवारी, २०१३

(माणूस व देश)


(कथा क्र. ३६)  

इनामदार सर शाळेत फार प्रसिद्ध होते. कारण ते नेहमी आपला विषय जरा वेगळ्या पद्धतीने शिकवीत असत. इनामदार सर हे राष्ट्रभक्त होते. त्यांना आपला देश, मातृभूमी याबद्दल प्रेम होते. ते एक उपक्रमशील शिक्षक असल्याने त्यांनी एकेदिवशी मुलांना असाच एक उपक्रम सांगितला. भारताचा नकाशा ! भला मोठा नकाशा असलेला एक कागद त्यांनी बरोबर आणला. त्यावर विविध प्रांतांच्या हद्दी निरनिराळ्या रेषांनी दाखविल्या होत्या, शिवाय नकाशाच्या चित्राच्या मागेसुद्धा एक चित्र सरांनी काढला होता. मग त्यांनी कात्री घेतली, त्यामागील भागावर जे चित्र होतं, त्या चित्राचे जे निरनिराळे भाग होते त्यानुसार त्या चित्राचे तुकडे कापले, अर्थातच भारताच्या नकाशाचेही तुकडे झाले, मग सर म्हणाले, "मुलानो! आता हे तुकडे एकत्रित करा आणि भारताचे नकाशाचे चित्र पूर्ण करा," सारे विद्यार्थी सरसावले, हे तुकडे वेडेवाकडे कापले गेले होते.बऱ्याच विद्यार्थ्यांनी प्रयत्न करून पाहिले पण त्यांना ते चित्र जोडणे जमले नाही. त्याच वर्गात सलील नावाचा विद्यार्थी होता. तो पुढे आला आणि म्हणाला," सर मला एक संधी द्या मी चित्र पूर्ण करतो." सलील तुकडे जोडू लागला, त्याने नकाशाच्या बाजूने चित्र जोडले नाही तर मागील चित्राच्या बाजूने चित्र जोडायला सुरुवात केली, भारताचा नकाशाच्या मागच्या बाजूला माणसाचा चित्र इनामदार सरांनी काढला होता. सलीलने माणसाचं चित्र जोडला आणि भारताचा नकाशा तयार झाला. इनामदार सरांनी सलील ला शाबासकी दिली आणि म्हणाले, "देश म्हणजे सीमा नाहीत तर देश म्हणजे माणूस, माणूस जोडला कि आपोआपच देश जोडला जातो." 

तात्पर्य- माणसांचे हितसंबंध चांगले असले कि देशाची एकात्मता सिद्ध होते. 
वर्तमानपत्रातून संग्रहित