शनिवार, १७ डिसेंबर, २०१६

स्‍वावलंबनातून बंधा-याचे काम

फेसबुक.कॉम/मराठी बोधकथा

कथा क्र.255

उत्तर प्रदेशातील एका छोट्याशा गावात एका संन्‍याशाने मुक्काम केला होता. ज्‍या गावात संन्‍याशीबुवा राहत होते तेथे पावसाळ्यात गंगानदीला प्रचंड पूर येत असे. त्‍यामुळे गाव पाण्‍यात बुडून जात असे. संन्‍याशीबाबांना हे गावाचे दु:ख बघवले नाही. त्‍यांनी गावक-यांना याबाबत विचारले असता सगळे गावकरी म्‍हणाले महाराज पाऊसकाळ सुरु झाला की आम्‍ही आमची घरेदारे इथेच सोडून दुस-याठिकाणी स्‍थलांतर करतो. पाऊस येतो, गंगामाई रौद्रावतार धारण करते आणि आमचे सर्वस्‍व लुटून परत जाते. मग पूर ओसरला की आम्‍ही येथे येतो आणि पुन्‍हा सगळी जमवाजमव चालू होते. संन्‍याशीबुवांना वाईट वाटले, त्‍यांनी संपूर्ण गावाची पाहणी केली आणि त्‍यांच्‍या असे लक्षात आले की एकाच ठिकाणाहून गावात नदी प्रवेश करते आणि त्‍या जागेवर जर बंधारा बांधला तर नदीचा गावातील प्रवेशाचा मार्ग बदलता येऊ शकतो. यासाठी त्‍यांनी गावातील लोकांना बंधारा बांधण्‍याविषयी सुचविले. गावकरी म्‍हणाले, महाराज, आम्‍ही प्रशासनास नदीवर बंधारा बांधण्‍याविषयी अनेकदा सांगून पाहिले पण त्‍याची दखल कोणीही घेतली नाही. संन्‍याशीबुवा म्‍हणाले, मग आपण बंधारा बांधूया. श्रमदानाने काही वाटेल ते शक्य आहे. पण कोणीही तयार झाले नाही. मग दुसरे दिवशी संन्‍याशीबुवाने स्‍वत:च कुदळ, फावडे, पाटी घेऊन बंधा-याचे काम सुरु केले. काही लोकांनी ते पाहिले. रोजच संन्‍याशी दिवसभर एकटाच काम करत असे. पण इतका मोठा बंधारा बांधणे हे काही त्‍यांच्‍या एकट्याच्‍या आवाक्याबाहेरचे होते. लोकांनी हे संन्‍याशीबुवाचे काम पाहिले व त्‍यांना वाटू लागले की हे महाराज त्‍यांचा कोणताही स्‍वार्थ नसताना किंवा त्‍यांचे कोणतेच नुकसान होत नसताना केवळ आपल्‍यासाठी इतके कष्‍ट घेत आहेत मग आपणही त्‍यांची मदत केली पाहिजे. हळूहळू लोकांनी महाराजांना मदत करायला सुरुवात केली आणि मग सगळ्या गावक-यांनी मिळून मोठा बंधारा त्‍या नदीवर बांधून काढला व पूर येण्‍यापासून गावाचे संरक्षण केले.

तात्‍पर्य :- अशक्‍य वाटणा-या गोष्‍टीसुद्धा एकमेकांच्‍या सहकार्याने सहजगत्‍या साध्‍य होऊ शकतात. गरज आहे ती फक्त संघटीत होऊन काम करण्‍याची.

वर्तमानपत्रातून संग्रहित

मराठी बोधकथा

अहंकारी राजाला धडा

फेसबुक.कॉम/मराठी बोधकथा

कथा क्र.254

एक अहंकारी राजा होता. त्‍याला आपल्‍या ऐश्‍वर्याचा आणि राज्‍याचा गर्व होता. तसेच आपली शक्‍ती आणि रूपावरही तो अहंगंड बाळगून असायचा. आपल्‍या बुद्धीचा टेंभा मिरवायचा. युद्धात जय मिळाला की त्‍याला गर्व चढायचा. आपल्‍यासमोर तो इतरांना तुच्‍छ लेखत असे. कोणाचा मुलाहिजा न बाळगता त्‍याचा तो अपमान करत असे. दुस-याला कमी लेखण्‍याचा त्‍याचा प्रयत्‍न असायचा. या कारणांमुळे लोक त्‍याच्‍यावर नाराज असायचे. त्‍याच राज्‍यात एका विद्वान पंडीताने त्‍याला वठणीवर आणण्‍याचे ठरविले. एके दिवशी तो पंडीत राजाच्‍या दरबारात गेला आणि राजाला प्रणाम केला. राजाने उद्दामपणे प्रतिनमस्‍कारही केला नाही उलट त्‍याने पंडीताला गर्वाने विचारले,’’बोला पंडीत महाराज, तुम्‍हाला काय मदत पाहिजे. काय मागायचे असेल ते मागून घ्‍या, दान पाहिजे असेल तर दान घ्‍या किंवा धन पाहिजे, सोनेनाणे, जमीन, धान्‍य जे काही मागायचे ते तुम्‍ही माझ्याकडून मागून घ्‍या’’ पंडीतजीने राजाकडे एकवार पाहिले व तो मोठमोठ्याने हसू लागला. राजाला व दरबारातील लोकांना पंडीताच्‍या हसण्‍याचे कारण काही कळेना, हसण्‍याचा भर ओसरल्‍यावर पंडीत म्‍हणाला,’’राजन, तुम्‍ही मला काय दान देणार कारण तुमच्‍याकडे मला देण्‍यासारखे काहीच नाही.’’ पंडीताचे हे बोलणे ऐकताच राजा संतापून लालबुंद झाला, राजाचे सैनिक पंडीताला मारायला धावून आले पण सेनापतीने सैनिकांना आवरले व पंडीताला पुढे काही बोलण्‍याची इच्‍छा आहे काय असे विचारले. त्‍यावर पंडीतजी म्‍हणाले,’’ महाराज, जरा थंड डोक्‍याने विचार करा, तुमचा जन्‍मच मुळी तुमच्‍या इच्‍छेने झाला नाही, मग रूप, सौंदर्य आणि पराक्रम हे गुण तुम्‍हाला कोठून मिळाले असते. आईवडीलांनी तुम्‍हाला जन्‍म दिला म्‍हणून तुम्‍ही जन्‍माला आलात. तुमचे धान्‍यभांडार हे धरतीमातेचे देणे आहे. तिने पिकवून तिच्‍या लेकरांसाठी अन्‍न पुरविले म्‍हणून तुम्‍ही ते सांभाळत आहात आणि खजिन्‍याचे म्‍हणाल तर धन हे करातून आलेले म्‍हणजेच प्रजेचे देणे आहे, राज्‍य हे तुम्‍हाला वाडवडीलांकडून मिळालेले वरदान आहे राहता राहिले शरीरातील प्राण पण तेही तुमचे नाहीत ते सुद्धा ईश्‍वराची कृपा आहे हे सगळेच जर तुम्‍हाला दुस-याने दिलेले असेल तर तुम्‍ही मला काय म्‍हणून देणार आणि दिलेल्‍या गोष्‍टीचा काय म्‍हणून गर्व बाळगणार.’’ एवढे बोलून पंडीताने राजदरबार सोडला व राजाने त्‍यादिवसापासून गर्व पण सोडून दिला,

तात्‍पर्यः- जे आपले नाही त्‍यावर गर्व बाळगणे व्‍यर्थपणाचे आहे.

वर्तमानपत्रातून संग्रहित

मराठी बोधकथा